लॉकडाऊन विषयी वडेट्टीवार यांनी दिली नवी माहिती
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारी मूळे काही मोजक्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सध्या लागू असलेले कोरोना गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासही सांगितले आहे.
या गाइडलाइन्सचे 31 मार्चपर्यंत पालन करा
27 जानेवारी, 2021 ला केंद्र सरकारने कोरोनाचे नवे गाइडलाइन्स लागू केले होते. कोरोना परिस्थितीवर लक्ष, कंटेनमेन्ट आणि खबरदारीबाबत आधी लागू असलेल्या या गाइडलाइन्सचे 31 मार्चपर्यंत पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक ती खबरदारी घ्या, कठोर पावलं उचण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
पुन्हा लॉकडाऊन होणार का?
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. यावर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात कोरोना फोफावत असला तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले जाणार नाही. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन नसला, तरी नागरिकांनी निर्बंध पाळावेत, मास्कचा नियम पाळावा यासाठी कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे. सध्या सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेवून वाहतूक करणाऱ्या बस, गाड्यांवरही निर्बंध घालणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील परीक्षांबाबत ते म्हणाले की, सध्या राज्यात सर्व गोष्टींचे आयोजन शक्यतांवर केले जात आहे. तसेच ऑनलईन पद्धतीने परीक्षा घेता येतील का? याचा विचारही आम्ही करत आहोत. जसे की तामिळनाडूमध्ये यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेण्याची गरज आहे, यावर अनेकांची मते घेवून विचार केला जात आहे. आम्ही सर्व प्रकारच्या शक्यतांवर विचार करत आहोत, त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.