राईस मिलर्सच्या मागण्यांवर सकारात्मक; धान भरडाई तातडीने सुरू करा – अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री
भंडारा जिल्ह्यातील राईस मिलर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक असून धान भरडाईसाठी प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील राईस मिलर्सनी धान भरडाईचे काम तातडीने सुरू करावे, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथे केली.
भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी तसेच राईस मिलर्सच्या अडचणी व मागण्यासंदर्भात मंत्रालयात डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, मार्कफेडचे सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांच्यासह राईस मिलर्स असोशिएशनचे पदाधिकारी नरेंद्र कावडे, भरत खंडाईत, अनिल मुंडले, सारंग खेडीकर आदी उपस्थित होते.
अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले की, भंडारा जिल्ह्यात यंदा विक्रमी धान खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मोठ्या प्रमाणात धान भरडाईसाठी तयार आहे. मात्र, राईस मिल्सनी अद्याप भरडाई सुरू केली नाही. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच राईस मिलर्सचेही नुकसान होणार आहे. राईस मिलर्सच्या मागण्यांवर शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेत आहे. भरडाईसाठी प्रोत्साहन भत्ता 30 रुपये देण्यासंदर्भात वित्त मंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच त्याबद्दल निर्णय होईल. तसेच केंद्र शासनाशी संबंधित विषयांवर पाठपुरावा करण्यात येईल. त्यामुळे मिल मालकांनी तातडीने भरडाई सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. यावेळी राईस मिल असोशिएशनच्या प्रतिनिधींनी भरडाईसाठी प्रोत्साहन भत्ता वाढविणे, वाहतूक व हमाल दर वेगवेगळे देण्यात यावे, बारदानासाठी वेगळे अनुदान द्यावे आदी विविध मागण्या मांडल्या.