#FarmerProtest : 18 फेब्रुवारीला देशभरात रेलरोको अभियान ; शेतकरी आंदोलकांची घोषणा
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमांवर जवळपास 80 दिवसांपासून शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने 18 फेब्रुवारी रोजी देशभरात रेलरोको अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.
संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, ”18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून चार वाजेपर्यंत संपूर्ण देशभरात रेलरोको अभियान राबवले जाईल. तसेच 12 फेब्रुवारीपासून राजस्थानचे सर्व टोलनाके मोफत करणार असल्याचे ही संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. तसेच 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याच्या स्मृतिदिनी जवान आणि शेतकऱ्यांसाठी कँडल मार्च आणि मशाल मार्च काढण्यात येईल. तर 16 फेब्रुवारीला सर छोटू राम यांच्या जयंतीनिमित्त किसान सॉलिडिरिटी शो केला जाईल, असंही संयुक्त किसान मोर्चाने सांगितले आहे. दरम्यान, “शेतकऱ्यांच्या हिसासाठी हरियाणातील जनतेने भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांवर दबाव टाकावा किंवा त्यांना खुर्ची रिकामी करण्यास सांगावे.” असे ही म्हंटले आहे
– 14 फेब्रुवारी : संध्याकाळी साते ते आठच्या दरम्यान शहीद किसान आणि जवान यांच्या स्मरणार्थ मशाल/कँडल मार्च
– 16 फेब्रुवारी : देशभरात सर छोटूराम जयंती
– 18 फेब्रुवारी : दुपारी 12 ते 4 दरम्यान रेलरोको
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच लोकसभेत शेतकऱ्यांमचे आंदोलन पवित्र असल्याचे म्हणाले आहे. सोबतच आंदोलनजीवींनी हे आंदोलन अपवित्र करत आहेत असे ही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संसद आणि सरकार शेतकऱ्यांचा अतिशय आदर करते आणि तिन्ही कृषी कायदे कोणासाठीही बंधनकारक नाही तर पर्यायी आहेत. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही.”
आपल्या मागणीसंदर्भात शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या दरम्यान दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शेतकरी संघटनांनी 6 फेब्रुवारी रोजी तीन तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती.