Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : एक नजर : भारत बंद लाईव्ह अपडेट : आंदोलक शेतकऱ्यांची होणार आज गृहमंत्र्यांशी चर्चा , आंदोलक शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Spread the love

भारत बंदबरोबर शेतकरी आंदोलनानं तीव्र स्वरूप धारण केलं आहे. देशभरात भारत बंद पाळण्यात आल्यानंतर आता उद्या सरकार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, उद्याच्या बैठकीपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शाह यांनी शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली असून, सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू होणार आहे. अचानक ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे. सकाळी अमित शाह यांच्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. ही बैठक अनौपचारिक असणार आहे. या बैठकीत १३ सदस्य गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

आम्ही आता सिंघु बॉर्डरला जात असून तेथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत. अमित शहा यांच्यासोबत आमची संध्याकाळी ७ वाजता बैठक आहे अशी  भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकेत माहिती यांनी दिली आहे. दरम्यान आम्ही विविध ५ पक्षांचे नेते एकत्र येऊन शेतकरी प्रश्नावर एक भूमिका ठरवणार असून आम्ही राष्ट्रपतींची बुधवारी संध्याकाळी ५ वाजता भेट घेणार आहेत आणि  आमचे म्हणणे आम्ही त्यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

आजचा बंद पाळणाऱ्या राज्यांमध्ये प्रामुख्याने पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंड आणि दिल्लीचा समावेश आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर  वर प्रदर्शनात सहभागी झाला होता. सोमवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना बहादुरगढ इथल्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विविध कारणांमुळे १२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी आज भारत बंदचं आवाहन केलं आहे. यामध्ये पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्र यांसहीत अनेक राज्यांचा समावेश आहे. ‘ऑल इंडिया किसान संघर्ष कॉर्डिनेशन कमिटी’च्या बॅनरखाली पुकारण्यात आलेल्या या भारत बंदमध्ये देशभरातील ४०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या बाजूने आणि सरकारच्या विरोधातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे युद्ध चांगलेच रंगले आहे. दरम्यान रविशंकर प्रसाद यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कडक प्रत्युत्तर दिले आहे. उद्या ५ विरोधी पक्षांच्या नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

दिल्ली: तीस हजारी कोर्टातील वकिलांनीही दिला शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिबा, आज कामकाज ठेवले बंद

आम आदमी पक्षाकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला तर दिल्ली पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र,  आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो असता  आपणास पोलिसांकडून अडवण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार  यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या टीकेला उत्तर  देताना म्हटले आहे कि , मी कृषीमंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते हे खरे आहे. एपीएमसी कायदा देशात राहिला पाहिजे, मात्र त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मात्र केंद्र सरकारचे नव्या तीन कायद्यांमध्ये एपीएमसीचा उल्लेखच नाही, असे सांगत पवार यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकार फक्त लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असून याला महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचे पवार यानी म्हटले आहे.

 भारतीय किसान संघाचा बंदला पाठिंबा नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघ ही संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेली नाही. शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला नसला तरी शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या चुकीच्या असल्याचंही या संघटनेचं म्हणणं नाही. तर केंद्रानं लागू केलेल्या कृषी कायद्यात काही सुधारणा आवश्यक असल्याचं मत भारतीय किसान संघाकडून व्यक्त करण्यात आलं आहे. केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी शेतकरी संघटनांकडून आवाहन करण्यात आलेल्या ‘भारत बंद’चं आम्ही समर्थन करणार नाही. परंतु, कृषी कायद्यांत काही सुधारणा आवश्यक आहे, असं भारतीय किसान संघाकडून सांगण्यात येतंय.

भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांना अटक

वाराणसीतही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविंद्रपुरी भागात किसान यात्रा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या ‘भीम आर्मी’ प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या अगोदरही काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर रावण आपल्या समर्थकांसोबत उत्तर प्रदेश सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी होताना दिसले होते.

अनेक नेते नजर कैदेत

भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून ठिकठिकाणी या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.  तर रस्त्यावर येणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी राष्ट्रीय लोक दल नेते इंदरजीत सिंह यांनाही गाझियाबादमध्ये त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवलंय. इंदरजीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत भारत बंदमध्ये सहभाग घेण्यासाठी निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली.

अण्णा हजारे यांचे उपोषण आणि सरकारला  इशारा

मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात  शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघावा यासाठी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू असलेल्या या आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णांनी राळेगणमधील पद्मावती परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवशीय उपोषण सुरू केले आहे. केंद्र सरकारने यापूर्वीही ही दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केला.

या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले नाही, तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये करेल, असा इशाराही अण्णांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे. यावेळी  माध्यमांशी बोलताना हजारे म्हणाले की, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता दिली पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार, पिकांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा हमी भाव दिला पाहिजे. ही मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. मात्र, त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यापूर्वी एकदा दिल्लीत तर एकदा राळेगणसिद्धीत आंदोलन केले होते. दोन्ही वेळेस केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही स्वामिनाथन आयोगानुसार शेती मालाला हमीभाव व कृषी मुल्य आयोगाला स्वायत्तता मिळालेली नाही, असा आरोप यावेळी अण्णांनी केंद्र सरकार केला.

असा आहे महाराष्ट्रातील बंद

औरंगाबाद शहरात  जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळे व भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक घटली. सरासरी पेक्षा केवळ दहा ते पंधरा टक्के आवक झाली होती . दरम्यान औरंगाबादेत नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान आंदोलकांनी शहरातील दिल्लीगेट परिसरात निदर्शने केली. या सर्वपक्षीय निदर्शकांनी दिल्ली गेट भागात काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये झटापट झाली.

जालन्यात जाळला मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळा, भारत बंदला पाठिंबा

सांगलीमध्ये भारत बंद आंदोलन दरम्यान सांगली मध्ये युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. केंद्र सरकारचा पुतळा दहन करताना सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात समोर हा प्रकार घडला. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रॅली काढत काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पुतळा दहन करण्याचा प्रयत्न होता .मात्र पोलिसांनी तो पुतळा काढून घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी हा पुतळा दहन प्रयत्न हाणून पाडला.

जळगावात भारत बंदला कडकडीत प्रतिसाद. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर

नाशिक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली कृषी विधेयकांची होळी. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा

सोलापूर शहरात पोलिसांनी नरसय्या आडम यांचा मोर्चा रोखला, नसरय्या आडम आणि माकपच्या कार्यकर्त्यांनि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, माकपच्या भारत बंदच्या समर्थनार्थ काढण्यात येणार होता मोर्चा, रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलीसांची धरपकड, माजी आमदार नरसय्या आडम आणि काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील हे दृश्य. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचा बंद मध्ये सहभाग

बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई-अहमदाबाद (नवजीवन) एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली

ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ‘भारतीय जयहिंद पार्टी’च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन. आंदोलन करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

नव्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिरोळ येथील त्यांच्या घराबाहेर कृषी विधेयकांची होळी करीत विधेयके तातडीने रद्द करण्याची मागणी केली.

पुण्यात बारामतीत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद दुपारी बारा वाजेपर्यंत व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा. दुपारनंतर सर्व दुकाने सुरू होणार असल्याचे व्यापारी महासंघाने केले स्पष्ट

नवी मुंबईत  भारत बंदला माथाडी कामगार, व्यापारी वर्गाचा पाठिंबा. एपीएमसीमधील पाचही मार्केट १०० टक्के बंद.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!