MaharashtraEducationUpdate : आज पासून सुरु होत आहेत राज्यातील शाळा , काय आहे अवस्था ?
राज्यात हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरु होत असताना मार्च महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरु किंवा बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या त्या जिल्हा प्रशासनावर सोपविला असल्याने राज्यातील काही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु होत असल्या तरी शहरी भागातील शाळा मात्र बंदच ठेवण्यात आल्या आहेत . त्यासाठी शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आज सकाळपासूनच शाळेत हजर झाले आहेत. आधी निर्जंतुकीकरण आणि इतर व्यवस्था केल्यानंतर आज पुन्हा एकदा वर्गांची साफसफाई करण्यात आली. तयारी पूर्ण झाल्यानंतर आता शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक यांसारख्या अनेक शहरांनी शाळा आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण शिक्षकांची संख्या ५ हजार ९८८ असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १९५७ इतकी आहे. तर आर टी पीसीआर टेस्टिंग झालेल्या शिक्षकांची संख्या ५ हजार १३६ तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १७६ इतकी आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचणीसाठी ६९ तपासणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आतापर्यंत एकूण तेरा शिक्षक आणि दोन शिक्षकेतर कर्मचारी असे १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान उर्वरित शिक्षकांचे अहवाल येणे बाकी असल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असले तरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल आल्याशिवाय शाळा सुरू होणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. शिक्षकांसाठी कोरोना ची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
दरम्यान शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना कोरणा ची बाधा होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण , महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी बी बी चव्हाण आणि सुरज प्रसाद जैस्वाल आदी परिश्रम घेत आहेत.
औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या सगळ्याच शाळा आज सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. कारण १७ टक्के शिक्षकांचीच नाही तर काही शिक्षकांची कोरोना टेस्टचा रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा आजपासून सुरु होण्याची शक्यता नाही. गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. अनेक शाळेतील शिक्षकांचे अद्यापही रिपोर्ट आले नसल्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत शाळेत बोलवले नाही.