Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला हा संदेश

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन केले आहे. आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ई-मेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाला सणवार-दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यांत आपण सर्वधर्मीयांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे, साधेपणाने आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत, हे विसरू नका, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.


मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले आहे कि , युरोपमधील देशांमध्ये करोना संसर्गाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. त्याठिकाणी रुग्ण झपाट्याने वाढत असून त्यांच्यासाठी रुग्णालयांची साधनसामग्री, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स कमी पडत आहेत. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल, हे ध्यानात घ्या. एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो, तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून करोनाशी लढताहेत, तुमचा-आपला सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत हे कृपया विसरू नका, एवढीच विनंती आहे. त्यांची दिवाळी रुग्णालयांमध्ये आणि कर्तव्य बजावताना जाणार आहे. या कर्मचाऱ्यांत आपली आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, मित्र कुणीही असू शकते. त्यांच्यावरचा ताण न वाढू देणे आणि घरातच राहून सुरक्षितरित्या दिवाळी साजरे करणे याला प्राधान्य द्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

दिवाळी हा सण मोठा असला तरी आपल्या परिसरात, आपल्या जवळचे, मित्रमंडळी- नातेवाईक यांच्या घरात करोनामुळे दु:खद घटना घडलेली असेल तर त्यांना या दिवाळीचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे उत्साह दाखवताना त्यांचाही विचार मनात राहू द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले. आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू करायची आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे, हात धुणे, अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा. फटाके वाजविणे आणि बाहेरच्या भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंब एकत्रितरीत्या हा सण साजरा करू शकते. हा दीपोत्सव असल्याने दिव्यांची आरास, रांगोळ्या, ज्यांना शक्य आहे त्यांना अंगणात किल्ले करणे, या काळात सुट्या असल्याने वाचन करणे, संगीत तसेच इतर आवड पूर्ण करा. तुमच्या घराचे दरवाजे मंगलमय शांती, समृद्धी, लक्ष्मी यांच्यासाठी उघडा, करोनासारख्या रोगासाठी नव्हे, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!