UttarPradeshaNewsUpdate : धक्कादायक : अमेठीत दलित सरपंचाच्या पतीला जिवंत जाळले
उत्तर प्रदेशात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मतदारसंघ असलेल्या अमेठीतील एका गावात दलित सरपंचाच्या पतीला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटनाघडली असल्याचं वृत्त आहे. पीडित व्यक्ती गावातील एका उच्चवर्गीय व्यक्तीच्या घरात ९० टक्के भाजल्याच्या अवस्थेत आढळला. त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पीडित महिला सरपंचानं गावातील पाच व्यक्तींवर आपल्या पतीला जिवंत जाळण्याचा आरोप केला आहे. कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमेठीच्या बंदुहिया गावाच्या सरपंच छोटका यांचे पती अर्जुन गुरुवारी सायंकाळी जवळपास साडे सहा वाजता गावातील चौकात चहा पिण्यासाठी गेले होते. तिथून ते बेपत्ता झाले. सरपंच छोटका यांच्या म्हणण्यानुसार, गावातील कृष्ण कुमार तिवारी तसेच त्यांच्या चार साथीदारांनी अर्जुन यांचं अपहरण करून त्यांना आपल्या घराच्या आवारात जिवंत जाळलं. कृष्ण कुमार याच्याकडून आपल्याला याअगोदरही अनेकदा धमकी देण्यात आली होती, असंही छोटका यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२ वाजल्याच्या सुमारास सरपंचाचे पती अर्जुन जळालेल्या अवस्थेत कृष्ण कुमार यांच्या घराच्या आवारात आढळले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आलं. तिथून त्यांना सुल्तानपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. आज सकाळी त्यांना लखनऊच्या रुग्णालयात हलवण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्जुन यांच्या कुटुंबीयांनी जळालेल्या अवस्थेतच त्यांचा जबाब आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. यामध्ये पीडित अर्जु यांनी पाचही आरोपींच्या नावाचा उल्लेख केला आहे. के के तिवारी, आशुतोष, राजेश, रवि आणि संतोष असं या आरोपींची नावं आहेत. पीडित कुटुंबीयांच्या आरोपानुसार, पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.