MaharashtraCoronaUpdate : राज्यात आढळले 5902 नवे रुग्ण तर 7833 रुग्णांना डिस्चार्ज
गेल्या २४ तासात राज्यात १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ७ हजार ८८३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के इतके झाले असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २७ हजारांपर्यंत खाली आली आहे. दरम्यान राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या-ज्या गोष्टींसाठी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे, त्या कायम राहतील.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झालेला नसल्याने व येत्या महिन्यात दिवाळी असल्याने सावध पाऊल टाकत सरकारने राज्यात लॉकडाऊन आणखी एक महिना वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अनेक निर्बंध शिथील करण्यात आलेले असल्याने त्याचा काही प्रमाणात फटका बसत आहे. करोनाचे आकडे थोडे कमी झाले असले तरी मृतांचा आकडा आणि दैनंदिन नवीन बाधितांचा आकडा अजूनही सरासरी पाच हजारच्यावर असल्याने सरकारकडून पुरेशी सतर्कता बाळगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करोनाची सद्यस्थिती दर्शवणारी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात राज्यात आणखी १५६ करोनामृत्यूंची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक ३३ मृत्यू हे मुंबई पालिका हद्दीत झाले आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत १२ जणांचा मृत्यू झाला असून पुणे पालिका हद्दीत दोन मृत्यू झाले आहेत. पुणे शहरात करोनामृत्यूचा कमी झालेला आकडा हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४३ हजार ७१० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.६२ टक्के इतका आहे.
गेल्या २४ तासांत ५ हजार ९०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ७ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९.६९ टक्के इतके झाले आहे. तो खूप मोठा दिलासा ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आणखी खाली येऊन आता २४ हजार १९४ झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात हा आकडा २० हजारच्या आत आहे. ठाणे जिल्ह्यात १९ हजार २५७ तर मुंबई पालिका हद्दीत १९ हजार ८२ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. करोनाची साथ आल्यापासून आतापर्यंत राज्यात ८८ लाख ३७ हजार १३३ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६ लाख ६६ हजार ( ६६८ १८.८६ टक्के ) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या २५ लाख ३३ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर १२ हजार ६९० जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.