Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HatharasGangRape : अभिव्यक्ती : मुख्यमंत्री योगींच्या ” समूळ नाश सुनिश्चित आहे ” या ट्विटचा अर्थ नेमका काय ? आणि कोणाचा सर्व नाश ??

Spread the love

उत्तर प्रदेशात हाथरस, बलराममपूर आणि भदोही या जिल्ह्यांसोबतच आणखी काही ठिकाणी मुलींवर बलात्कार आणि क्रूर हत्येची प्रकरणं समोर आल्यानंतर जनतेतही आक्रोश दिसून येत आहे . यामुळे दोषींवर कारवाई करण्यासाठी योगी सरकारवर दवाब वाढत असून चौफेर टीका होत आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘माता-भगिनींवर अत्याचार करण्याचा विचारही करणाऱ्यांचा समूळ नाश सुनिश्चित असल्याचं’ ट्विट केलं आहे. त्यामुळे समूळ नाश  म्हणजे नेमकं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे कि , ‘उत्तर प्रदेशात माता – भगिनींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला इजा पोहचवण्याचा विचारदेखील करणाऱ्यांचा समूळ नाश सुनिश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा मिळेल जी भविष्यात एक उदाहरण प्रस्तुत करेल. तुमचं उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता – भगिनीच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी संकल्पबद्ध आहे. हाच आमचा संकल्प आहे. वचन आहे’ असं योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान हाथरस घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना  भाजप नेता कैलास विजयवर्गीय यांनी म्हटले होते कि , ‘योगी जी के प्रदेश में कभी भी गाड़ी पलट जाती है’. त्यांच्या या अजब विधानामुळे कुख्यात विकास दुबेच्या एन्काऊंटरची आठवण त्यांनी करून दिली होती मात्र त्यांचा हे शब्दप्रयोग करण्याचा हेतू काय ? हे लक्षात आले नव्हते. मात्र हे लक्षणीय आहे कि , उत्तर प्रदेशातल्या गँगस्टर विकास दुबे प्रकरणानंतरही राज्यातील कायदे व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगलेली दिसली. या प्रकरणातील अनेक आरोपींचा मृत्यू फिल्मी स्टाईल पोलीस एन्काऊन्टरमध्ये झाल्यानंतर यावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले  होती. त्यामुळेच योगींच्या ‘समूळ नाश सुनिश्चित…’ असल्याचं वक्तव्य काय इशारा करतंय? असा प्रश्न अनेकांना उपस्थित केला जात आहे ?

हाथरस बलात्कार प्रकरणात प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलीस अधिक्षकांविरुद्ध कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांवर सायंकाळपर्यंत कारवाई झाली असून जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीनं हाताळण्यात आलं, त्यामुळे राज्याची बदनामी होत असल्याने त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष तपासणी पथकही (एसआयटी) गठीत केली आहे आणि  त्यांनी आपली चौकशीही सुरु केली आहे. य चौकशीवरूनही मोठा गाझाब चालू आहे . चौकशीच्या दरम्यान कुठल्याही मीडियाला  किंवा कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे काल काँग्रेसनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अडवण्यात आले तर आज टीएमसीच्या शिष्टमंडळाला आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीला पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी जाऊ दिले नाही. यावरूनही योगी आदित्यनाथ टीकेचे धनी झाले आहेत.

भाजनेत्या माजी मंत्री उमा भरती यांनी स्वतः या मज्जाव प्रकरणावरून योगी सरकारला घराचा आहेर दिला आहे. एसआयटी चालू असताना कोणी गावात जाऊच नये किंवा विरोधी नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भूमिका घेऊच नये असे काहीही नसल्याचे उमा भरती म्हणाल्या.  पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना द्यायला हवा होता असेही त्यांनी म्हटले आहे  तर दुसरीडे, जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मृत मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याला धमकावण्याचे आणि दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण मिटवण्याचं सांगतानाच ‘मीडिया निघून जाईल पण प्रशासन मात्र इथंच राहील’, असं पीडित कुटुंबीयांसमोर म्हणत असल्याचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने योगी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काल पीडितेच्या घरून लपत छपत मीडियापर्यंत पोहोचलेल्या लहान मुलानेही कुटुंबावर असलेला दबाव कथन केला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून पीडितेच्या मृतदेहावर कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध अर्ध्यारात्रीच अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचाही आरोप पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आला असून अंत्ययात्रेच्या प्रसंगी जे लोक आमच्या कुटुंबातील असल्याचे सांगत आहेत त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे पीडितेच्या वाहिनीने सांगितल्यामुळे जिल्हा प्रशासनाची पोल  खुलली आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ‘पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवायला हवा होता’ असं म्हणत या आरोपावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केलं आहे. या आरोपांमुळे प्रशासनाच्या वर्तवणुकीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तर, फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या रिपोर्टमध्येही पीडितेवर बलात्कार झाल्याचे पुरावे आपल्याला मिळाले नसल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी (कायदा व सुव्यवस्था) यांनी म्हटल्यामुळे संतापात आणखी वाढ झाली आहे. हा तपासाचा भाग असल्याने तो उघड करण्याची घाई त्यांनी का करावी असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

मुलीच्या निधनाच्या एक दिवस आधी हि घटना देशाच्या पटलावर अली तेंव्हा सर्व काही संपलेले होते . पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार दि . १४ सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये पीडित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, बलात्कारानंतर तरुणीची जीभ छाटण्यात आली होती तसंच तिच्या पाठीचा मणकाही तोडण्यात आला होता. तिचा भावाने याबद्दल माहिती देताना सांगितले कि , माझ्या बहिणीला गंभीर अवस्थेत घेऊन आम्ही जेंव्हा ठाण्यात घेऊन गेलो तेंव्हा पोलीस म्हणाले , नेक करतेय तुझी बहीण , उठाव आणि घेऊन जा तिला . त्यावरून पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेच नाही. त्यामुळे तिला सामान्य रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच १५ दिवसानंतर तिचा मृत्यू झाला . शुद्धीत आल्यानंतर तिने पोलिसांना आणि मीडियाला आपला जबाबही दिला त्यावरून तिला तत्काळ दिल्लीच्या एम्समध्ये तिला दाखल केले असते तर ती वाचली असती मात्र गेल्या सोमवारी प्रकृती बिघडल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं शेवटी  मंगळवारी सकाळी तिनं अखेरचा श्वास घेतला आणि देशाचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!