Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HatharasRapeCase : संतापजनक : रात्रीच्या अंधारातच पीडितेवर परस्पर केले अंत्यसंस्कार , देशभर संताप , योगी सरकार कडून चौकशी समितीची घोषणा

Spread the love

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील १९ वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर पीडितेवर पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केले असल्याचे वृत्त असून याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.  याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर आरोप केले आहेत. हाथरसमधील अत्याचार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.


उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असताना  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवड्याभराच्या आता रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशचे गृह सचिव भगवान स्वरुप यांच्या देखरेखीखाली तपास समितीचे कामकाज चालणार आहे. या समितीमध्ये महिलेसह दलित समाजातील सदस्याचाही समावेश करण्यात येणार आहे. पीडित तरुणीवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले. तिच्या शरीरावर जखमा होत्या. उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर चहूबाजूंनी जोरदार टीका सुरु आहे. त्यामुळे तात्काळ या तपास समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागच्या काही आठवड्यांपासून पीडित तरुणीचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता. अखेर काल दिल्लीतील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

मृतदेह आमच्या ताब्यात दिला नाही

पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असे दिसत आहे. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीत. अखेरचं एकदा तिचं पार्थिव घरी आणलं जावं यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”. रात्री १० वाजता पीडित तरुणीचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर धरणे धरण्यात आली. दरम्यान मृतदेह आमच्या ताब्यात न देता परस्पर पार्थिव बाहेर नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसंच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी यानंतर कुटुंब धरणे आंदोलन करत असून इतर काही संघटनांनी या मुद्द्यावर राजकारण सुरु केलं असल्याचा आरोप केला.

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या भावाने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या भावाने राज्यातील भाजप सरकारवरही निशाणा साधला. ‘पोलिसांनी दीदीसाठी अॅम्ब्युलन्सही बोलावली नाही. बहीण जमिनीवर पडली होती. त्यावेळी पोलिस सांगत होते तिला इथून घेऊन जा. ती बहाणे करतेय’, असं पीडितेच्या भावाने सांगितलं. पीडितेचे कुटुंबीय दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसलं होता. पण इथूनही पोलिसांनी त्यांना सोबत नेलं. पीडितेचे कुटुंबीय सफदरजंग रुग्णालयावरही आरोप करत आहे. पोस्टमॉर्टम झाले आहे. पण मृतदेह आमच्याकडे सोपवण्यात आलेला नाही. आम्हाला कोणताही रिपोर्टही देण्यात आलेला नाही, असं तिच्या भावाने सांगितलं.

एफआयआरसाठी आम्हाला ८-१० दिवस वाट पाहावी लागली…

एफआयआरसाठी आम्हाला ८-१० दिवस वाट पाहावी लागली. गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिस एका आरोपीला पकडत होते आणि दुसर्‍याला सोडत होते. धरणे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. पोलिसांनी आरोपींना १०-१२ दिवसांनी अटक केली, असं पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं. बहीण जमिनीवर पडली होती. तरीही पोलिसांनी तिच्यासाठी पोलिसांनी अॅम्ब्युलन्स बोलवली नाही. उलट तिला इथून घेऊन जा. ती बहाणे करतेय, असं पोलीस म्हणत होते. दीदीचे रक्तस्त्राव १० ते १५ दिवस थांबला नाही. २२ सप्टेंबरनंतर तिला चांगला उपचार मिळू लागला. तिच्याबाबत पोलिस आणि प्रशासनाने हलगर्जीपणा केला. तिच्यावर योग्य उपचार केले गेले नाहीत, असं पीडितेचा भाऊ म्हणाला. आपल्या बहिणीला सामान्य वॉर्डात ठेवण्यात आलं होतं. आम्हाला उत्तर प्रदेश सरकारकडून न्यायाची कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही. भाजप सरकार या घटनेवर काहीही बोललेलं नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही काहीच बोलले नाहीत, असं पीडितेचे भाऊ म्हणाले. आम्हाला न्याय हवा आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवीय, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

पीडित मुलीला अलिगढच्या जेएन मेडिकल कॉलेजमधून दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये रेफर केलं गेलं. अलिगढ मुस्लि विद्यापीठाच्या जेएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉ. एम एफ हुड्डा यांनी या प्रकरणी माहिती दिली. पीडित तरुणीला १४ सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. तिचा मणका तुटला होता. यामुळे संपूर्ण शरिराला लकव्याचा झटका बसला होता. पीडित तरुणी त्यावेळी बेशुद्ध होती. तिला आयसीयूत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आम्ही तिच्यावर शक्य ते सर्व उपचार करत होतो, असं डॉक्टर म्हणाले.

राहुल गांधी यांची टीका , शेअर केला अंधारातील अंत्यसंस्काराच्या व्हिडीओ

‘भारत की बेटी’ वर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्य लपवलं जात आहे आणि शेवटी तिच्या परिवाराचा अंत्यसंस्कार करण्याचा हक्क देखील हिरावला जातोय, असं ट्वीट राहुल गांधींनी एक व्हिडीओ शेअर करत केलं आहे . युपीतील वर्ग-विशेष जंगलराजने आणखी एका तरुणीची हत्या केली. ही फेक न्यूज आहे असं सांगत सरकारने पीडितेला मरण्यासाठी सोडून दिलं. दुर्दैवाने ही घटना फेक न्यूज नव्हती, ना पीडितेचा मृत्यू आणि ना सरकारची क्रूरता, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर जबरदस्ती अंत्यसंस्कार करण्यात आल्याने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही गुन्हा रोखला नाहीत पण गुन्हेगाराप्रमाणे वागलात अशी टीका प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश प्रशासनावर केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “रात्री २.३० वाजता कुटुंबीय विनंती करत होते, पण उत्तर प्रदेश प्रशासनाने पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. जेव्हा ती जिवंत होती तेव्हा तिला सरकारने कोणतीही सुरक्षा दिली नाही. जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचारही केले नाहीत. पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुंबीयांचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार काढून घेतला. मृत पीडितेला सन्मानही दिला नाही”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “तुम्ही गुन्हा रोखला नाहीत तर गुन्हेगाराप्रमाणे वागलात. अत्याचार रोखले नाहीत तर एका निरागस मुलगी आणि तिच्या कुटुंबावर दुप्पट अत्याचार केले. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या कार्यकाळात न्याय नाही तर फक्त अन्याय सुरु आहे”.

पीडितेच्या परिवाराला  पोलिसांनी हटवलं.

सफदरजंगमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या परिवाराला काल पोलिसांनी तिथून हटवलं. परिवाराकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हॉस्पिटलसमोर आंदोलन सुरु केलं होतं. पीडितेच्या भावाचं म्हणणं आहे की, आमची दिशाभूल केली जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे. हॉस्पिटलबाहेर काँग्रेस, भीम आर्मी आणि अन्य संघटनांनी देखील आंदोलनं केली. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणी न्याय व्हावा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

पोलीस महासंचालकांच्या सरकारी उत्तर

या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात केस दाखल करण्याबाबत आयजी पीयूष मोर्डिया यांचं म्हणणं आहे की, पीडितेच्या जबाबानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र रेप झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, कारण जे एन मेडिकल कॉलेजच्या रिपोर्टमध्ये तसं म्हटलं आहे. सॅम्पल 26 सप्टेंबर रोजी फॉरेंसिक सायंस लॅबोरेटरीकडे पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. ते रिपोर्ट आल्यावर याबाबत स्पष्टपणे माहिती येईल असं, मोर्डिया यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात चार आरोपिंना पकडण्यात आलं आहे.

युपीतील हाथरसमध्ये दलित तरुणीवर निर्भयासारखे क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केलं गेलं आणि नंतर कँडल मार्च काढण्यात आला. युपीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली गेली. तर काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या मौनावर सवाल केला आहे. काँग्रेससह समाजवादी पार्टी, बसपा, आम आदमी पार्टी आणि भीम आर्मीसारख्या संघटना आणि पक्ष भाजप सरकारविरोधात आक्रम झाले आहेत. तर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि तिची जीभ कापल्याचे आरोप वैद्यकीय अहवालाच्या आधारावर फेटाळून लावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला आहे. तसंच पीडितेला जलद गती न्यायालयाद्वारे तातडीने न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीय. गुजरातमधील काँग्रेसने अर्जुन मोढवाडिया यांनी २०१२ चे पंतप्रधान मोदींचे जुने ट्विट रिट्विट केले आहे. तसंच मोदी गप्प का? असा सवाल केला आहे. हाथरसमधील ज्या तरुणीचा मृत्यू झाला तीही भारताची कन्या होती. निर्भयाच्या वेळी तुम्ही बोललात. पण आज कुठलाच आक्रोश का नाही? मुख्यमंत्री योगी गप्प का? स्मृती इराणी गप्प का? असा सवाल त्यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!