CoronaMaharashtraCurrentUpdate : दिलासादायक : बरे होऊन जाणारांचा विक्रम , १३४०८ रुग्णांना डिस्चार्ज, मात्र १२७१२ नवे रुग्ण
गेल्या २४ तासांत राज्यातील विविध रुग्णालयांतून १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. हि संख्या राज्यासाठी आज विक्रमी ठरली त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) ६९. ६४ टक्के इतका झाला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. आत्तापर्यंत एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रग्ण बरे होण्याच्या दरात एक टक्क्याने वाढ झाली असून सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ६९.६४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७ हजार ५१३ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
एकीकडे बरे होणारे रुग्ण वाढत असले तरी कोरोना संसर्गाचा राज्यात उपद्रव वाढतच असून, दररोजच बाधित रुग्णांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज तब्बल १२ हजार ७१२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ इतकी झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २९ लाख ०८ हजार ८८७ चाचण्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ (१८.८४ टक्के) चाचण्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील मृतांचा वाढत आकडा
दरम्यान आज राज्यात ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के इतका आहे. राज्यात आज झालेल्या मृत्यूंमुळं राज्यातील एकूण मृतांचा आकडा १८ हजार ६५० इतका झाला आहे. आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर, ६६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू नाशिक- १२, ठाणे जिल्हा- ११, पालघर-३, कोल्हापूर- ३, परभणी-२, धुळे- २, उस्मानाबाद-२, औरंगाबाद-१, लातूर-१, नंदूरबार-१, सांगली-१ आणि सोलापूर- १ असे आहेत.