CoronaMaharashtraUpdate : राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ०८८ नवीन रुग्णांची नोंद तर २५६ रुग्ण दगावले
राज्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ०८८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सलग तीन दिवसांपासून राज्यात १० हजारांच्या घरात कोरोना रुग्ण आढळत असल्यानं चिंता अधिक वाढली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य प्रशासनानं कंबर कसली आहे. असं असताना राज्यातील एकूण करोनारुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी झटणाऱ्या आरोग्य प्रशासनाला काही प्रमाणात यश आल्याचं दिसत आहे. आज राज्यात तब्बल १० हजार ०१४ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) ६८.७९ टक्के इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ रुग्ण करोनाची लढाई जिंकून घरी परतले आहेत. तर, सध्या विविध रुग्णालयात १ लाख ४८ हजार ५५३ अॅक्टिव्ह रुग्ण असून करोनावर उपचार घेत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज राज्यात २५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३. ४२ इतका झाला आहे. तर, एकूण करोनाबळीचा आकडा १८ हजार ३०६वर पोहोचला आहे. आज नोंद झालेल्या एकूण २५६ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर, ३४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ११ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११ मृत्यू ठाणे जिल्हा -७, पालघर-२, कोल्हापूर-१ आणि नाशिक-१ असे आहेत.