CoronaPuneNewsUpdate : जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाच्या वेळेतील बदल समजून घ्या
मुंबई , ठाणे नंतर पुण्यात कोरोनाचा मोठा संसर्ग असून हि साखळी तोडण्यासाठी शहरात पाच दिवसाचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. आता उद्यापासून या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वेगळे नियम लागू होणार आहेत. मात्र त्यात उद्यापुरता किंचितसा बदल पालिका व पोलिसांच्या समन्वयातून घेण्यात आला आहे. उद्यासाठी सुधारित सूचना जारी करताना त्याबाबत पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात पाच दिवसांसाठी पुणे शहरात कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यात १४ जुलैपासून पुणे शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा उद्या १९ जुलैपासून सुरू होत आहे. त्यात काही प्रमाणात निर्बंध शिथील केले जाणार आहेत. मात्र केवळ उद्याच्या दिवसापुरता नियमांत बदल करण्यात आला आहे. पुण्यात उद्यापासून सकाळी ८ ते रात्री १२ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, उद्याचा दिवस यात थोडी सुधारणा असेल. उद्या रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी असेल. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल आहे. याची सर्वांनीच नोंद घ्यावी व झुंबड टाळून कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी नमूद केले.
ग्राहकांसोबतच दुकानदारानेही आवश्यक उपाययोजना करून गर्दी होऊ नये याबाबत दक्षता बाळगायची आहे. तसे न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिसवे यांनी दिला. पुणेकरांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेले पाच दिवस चांगल्या शिस्तीचे दर्शन सर्वांनीच घडवले. या पुढच्या काळातही असेच सहकार्य करावे, असे आवाहनही शिसवे यांनी केले.
पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१ हजार ३८० इतकी आहे. या आकडेवारीनुसार मुंबईपेक्षाही हि संख्या अधिक आहे. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत आता २३ हजार ९१७ करोना बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ठाणे, पुणे, मुंबई नंतर पालघर, रायगड, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ३ ते ५ हजारच्या टप्प्यात अॅक्टिव्ह रुग्ण असून वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.