AurangabadUpdate : औरंगाबादकरांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या ८ दिवसांच्या कडक कर्फ्यूबद्दल ….
औरंगाबाद जिल्ह्यात विनाकारण प्रवेश करू नका अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी मंगळवारी (ता.7) दिला. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूवर 10 जुलै ते 18 जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. त्यावरच सविस्तर माहिती देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. शहरात प्रवेश करताना आणि शहराबाहेर जाण्यासाठी पासधारकांनाच परवानगी राहील. त्यातही अत्यावश्यक कामांसाठी आणि शासकीय कामांकरिता ही परवानगी राहील.
मनपा आयुक्त पुढे म्हणाले, शहरात जेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तेथील 500 मीटरचा संपूर्ण परिसर क्वारंटाईन केला जाणार आहे. एचएमएच मोबाइल अॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला कोरोना संदर्भात अपडेट मिळतील. स्वत: उपचारासाठी माहिती पाठवता येईल आणि सेल्फ टेस्ट करणे, कुठे क्वारंटाईन, उपचार घेता येऊ शकतात याची सविस्तर माहिती मिळेल. हाऊस टु हाऊस सर्वेक्षण करणे सोपे होईल. सोबतच, अत्यावश्यक सेवेसाठी सिटी बस, पोलिस स्टेशनमध्ये रुग्णवाहिका आणि 10 ऑटो रिक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरात येणे टाळाच!
शहरात बाहेरून येणाऱ्यांनी शक्यतो प्रवास टाळावा असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांवर आता कटाक्षाने लक्ष ठेवले जाणार आहे. शहरात बाहेरून येणाऱ्यांना कोरोनाची टेस्ट करावी लागेल. रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना रुग्णालय किंवा इंस्टिट्युशनमध्ये थांबावे लागेल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना वेळीच भरती केले जाईल. चेक पोस्ट आणि इतर तपास केंद्रांवर एका तासात टेस्ट होणार आहे अशी माहिती सुद्धा पांडे यांनी यावेळी दिली.
पेट्रोल डीझेल भरण्यावरही निर्बंध
10 जुलै ते 18 जुलै दरम्यान शासकीय आणि अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कुणालाही बाइकवर सुद्धा बाहेर पडता येणार नाही. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. सरकारी पेट्रोल पंपांवर आता केवळ शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा यासाठी परवानगी असलेल्या वाहनांनाच पेट्रोल आणि डीझेल भरता येईल. खासगी पेट्रोल पंपावर काही बंधने लावण्यासाठी चर्चा सुरू आहेत असे मनपा आयुक्तांनी सांगितले.
4 टास्क फोर्स तैनात
बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा अधिकारी आणि कर्मचारी शहरात कार्यरत राहतील. यासाठी 4 टास्क फोर्स तयार करण्यात आल्या आहेत. जवळपास 400 अधिकारी आणि कर्मचारी 12 तास काम करतील. यात लॉकडाउन सुपरव्हायजर आणि इतर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. हे टास्क फोर्सचे सदस्य विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना दंड लावणार आहेत. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा तपास करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांसह पोलिस सुद्धा तैनात केले जात आहेत. नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे आणि घरातच राहावे अशी विनंती सुद्धा मनपा आयुक्तांनी यावेळी बोलताना केली आहे.
दूध आणि न्यूज पेपर इत्यादी वाटपासाठी सकाळचे सत्र ठरवण्यात आले आहे. याच सत्रात दूध आणि पेपर टाकण्याची परवानगी राहील कृषी बाजारपेठा आणि बँका सुद्धा यावेळी बंदच राहतील. केवळ शासकीय आणि अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनाच परवानगी दिली जाईल. दरम्यान, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संचारबंदी संदर्भात सोमवारीच आदेश जारी केले आहेत. औरंगाबादेतील लोकप्रतिनिधी, पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या. याच बैठकीत उद्योजकांना देखील सामिल करण्यात आले होते. या सर्वांनीच 10 ते 18 जुलै दरम्यान लागणाऱ्या संचारबंदीचे समर्थन केले.