Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू दर रोकण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

केंद्र सरकारने कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू दर रोकण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या करोनाचा सर्वाधिक उद्रेक असलेल्या १० राज्यातील, ३८ जिल्ह्यातील, ४५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून घरोघरी सर्व्हे केला जाणार असून तातडीची चाचणी घेतली जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विविध ४५ महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये विविध सवलती देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या १० राज्यातील ३८ जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत राज्यांनी येत्या काही महिन्यात जिल्हानिहाय नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

अत्याधिक लोकसंख्येची घनता असलेले भाग, सार्वजनिक सुविधा असलेले भाग, घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे महत्त्व, तत्काळ चाचणी, केसेसचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि अंमलबजावणीची गरज असलेले कंटेन्मेंट धोरण या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. कंटेन्मेंट झोनमध्ये केसेसचे व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी यावर लक्ष देण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी वृद्ध व्यक्ती, विविध आजार असलेले रुग्ण, अशा अनेक हाय रिस्कमधील लोकांना ओळखणे, तसेच संपर्कातील व्यक्तींची ओळख पटवणे असे उपाय आवश्यक असल्याची चर्चा देखील या बैठकीत करण्यात आली आहे.

केसेस लवकर ओळखण्यासाठी सक्रिय निगराणी आणि पुरेशी चाचणी सुविधा आवश्यक आहे. लक्षण दिसण्याच्या अगोदरच रुग्ण ओळखले जावेत, यावर भर देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. वेळेवर घरोघरी सर्वेक्षण, सर्वेक्षण साहित्यात वाढ, पुरेसे रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार आणि बेडची उपलब्धता, उपचार घेत असलेल्या रुग्णांना २४ तास कार्यरत असलेल्या पथकाकडून सुविधा देण्यात याव्यात, जेणेकरुन मृत्यू दर कमी करता येईल, तसेच लॅबकडून चाचणीचा अहवाल वेळेवर येईल याचीही खात्री करावी, ज्यामुळे रुग्ण वेळेत ओळखता येईल, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधीही प्रशासनाच्या कामकाजात सहभागी व्हावेत, जेणेकरुन लोकांमध्ये विश्वास येईल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील करोना बळींचा आकडा ७२०० वर गेला आहे, तर एकूण बाधितांचा आकडा २ लाख ५६ हजार ६११ एवढा आहे. देशात सध्या १ लाख २४ हजार ९८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर १ लाख २४ हजार ४३० रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात ५१३७ रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. आतापर्यंत ४८.४९ रुग्ण बरे झाले असल्यासे सरकारने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!