देश : राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर पुन्हा निशाणा , गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काय करताय सांगा ?
प्रवासी मजुरांच्या भेटीचा व्हिडीओ पब्लिश केल्यानंतर सुरु झालेल्या चर्चेचे उत्तर देताना , काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आम्ही २१ दिवसांत करोना विषाणूचा पराभव करू असे सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, मात्र ६० दिवसांचा काळ उलटला असूनही हा विषाणू जलदगतीने वाढतच आहे, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले आहे. देशातील लॉकडाउनचा उद्देशच असफल झाल्याचे ते म्हणाले. सरकारने सत्य स्वीकारायला हवे, कारण २१ दिवसांमध्ये सर्वकाही ठीक होईल असे मोदी म्हणाले होते, मात्र ६० दिवसांचा काळ उलटला तरी देखील काही होत नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान लॉकडाउनच्या ४ टप्प्यांमध्ये ज्या परिणामांची पंतप्रधान मोदी यांना अपेक्षा होती तसे झाले नाही, असे राहुल पुढे म्हणाले. आता लॉकडाउन अपयशी ठरलेला आहे. असे असताना सरकार आता पुढे काय करणार आहे हे आम्ही सरकारला विचारू इच्छितो, असे राहुल यांनी म्हटले आहे. संपूर्ण जगामध्ये लॉकडाउन उठवला जात असताना तेथील रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहेत. भारतात मात्र लॉकडाउन सुरू असतानाच रुग्णांची संख्या जलदगतीने वाढताना दिसत आहे. आणि लॉकडाउन हटायला लागलेला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. केंद्रातील मोदी सरकार गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहे, याचेही उत्तर राहुल गांधी यांनी मोदी यांच्याकडे मागितले आहे.