महाराष्ट्राचे राजकारण : ” नारायण , नारायण !!” नारायण राणे राज्यपालांना ठाकरे सरकारबद्दल काय म्हणाले पहाच…
राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते खा . नारायण राणे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत, राज्यातली स्थिती हाताबाहेर जात असल्याचा आरोप करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी त्यांनी केली. ठाकरे सरकारला परिस्थिती हाताळता येत नाही. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतले महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स हे लष्काराच्या ताब्यात दिले पाहिजेत. हे सरकार अपयशी ठरलंय. नाचता येईना अंगण वाकडे अशी सरकारची स्थिती झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यांनतरही भाजप नेत्यांच्या किंवा भाजप समर्थकांच्या अजूनही पचनी पडायला तयार नाही. दरम्यान सरकारच्या विरोधकांनी उठ सुठ राज्यपालांना वेठीस धरणे सुरु केले आहे. कधी मुख्यमंत्री , कधी विरोधी पक्ष नेते , कधी सरकार पक्षांचे प्रवक्ते यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राज्याच्या प्रश्नांसंदर्भात निवेदने देण्याचा सपाट लावला आहे . दरम्यान याच मालिकेत खासदार नारायण राणेही वेळात वेळ काढून आज राज्यपालांची भेट घेऊन आपले निवेदन राज्यपालांना सादर केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून भाजप नेत्यांच्या राजभवनातील बैठका वाढल्या आहेत. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं बैठकीचं आमंत्रण, त्यात मिलिंद नार्वेकर यांची हजेरी. एवढंच काय तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची घेतलेली भेट, नंतर ‘सामना’तून राज्यपालांवर केलेली आगपाखड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वत: राज्यपालांची घेतलेली भेट आणि आता भाजप नेते नारायण राणे राज्यपालांच्या भेटीला गेल्याने रोजदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे.