AurangabadNewsUpdate : लॉकडाऊनचे उल्लंघन, जिल्हयात ५४ व्यक्तीं विरोधात वेगवेगळे १९ गुन्हे दाखल
औरंगाबाद जिल्हयात भादंवि १८८ अन्वये जिल्हाधिकारी यांच्या अधिसुचनेचे उल्लंंघन केले म्हणुन २१ मे रोजी ५४ व्यक्तीं विरोधात वेगवेगळे १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन या अधिसुचनेचे उल्लंघन केले म्हणुन ८७० गुन्हे भादंवि १८८ अन्वये दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद (ग्रामीण) यांनी कळविले आहे .
जिल्हयात जमावबंदी व संचारबंदी आदेश जिल्हाधिकारी यांनी लागु केले आहे. तसेच या आदेशाचे उल्लघंन करणा-यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.संचारबंदी शिथिलिकरण काळामध्ये ज्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तुची आवश्यकता आहे, त्यांनीच, घरातील एका व्यक्तीनेच घराबाहेर पडावे. इतरांनी घराबाहेर पडु नये. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, स्टोअर, भाजीपाला विक्रेते यांच्या दुकानांसमोर गर्दी करू नये. सर्व नागरिकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन ग्रामीण पोलीस प्रशासना मार्फत करण्यात येत आहे .
जिल्हयात वेगवेगळया ठाण्याच्या हद्यीत अवैध दारू विक्रेते, हातभट्टी दारू बनविणारे यांच्यावर दि. २१ मे रोजी एकुण १९ ठिकाणी धाडी टाकून ३० आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) व ६५ (फ) अन्वये १९ गुन्हे दाखल करून ८७,३२२ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन दिनांक २२ मे पर्यंत जिल्हयात वेगवेगळया पोलीस ठाण्याच्या हद्यीत अवैध दारू विक्रेते, हातभट्टी दारू बनविणारे यांच्यावर एकुण ५०२ ठिकाणी धाडी टाकून ५९० आरोपीं विरूध्द गुन्हे दाखल करून ८१,०८,०४३ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,असे पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद (ग्रामीण) यांनी कळविले आहे.