Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शाब्बाश मोदी सरकार : ‘वंदे भारत’ : १४९ विमानांनी जगभरातील ३० हजार विदेशी भारतीयांना आणणार, देशी प्रवाशांचे मात्र बेहाल ….

Spread the love

मोदी सरकारने जाहीर केलेल्या संकल्पानुसार जगभरातील विविध ३१ देशांत अडकलेल्या सुमारे ३० हजार भारतीयांना ‘वंदे भारत’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात मायदेशी आणले जाणार आहे. यामध्ये १६ मे ते २२ मे या काळात १४९ विमानांद्वारे या नागरिकांना भारतात आणले जाईल, असे हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले. ‘वंदे भारत’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात एअर इंडिया आणि तिची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसने ७ मे ते १४ मे या काळात ६४ विमानांद्वारे १२ देशांतून १४,८०० भारतीयांना सशुल्क पद्धतीने परत आणले. त्याच धर्तीवर आता दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतात २५ मार्चपासून लॉकडाउन सुरू असून, या काळात सर्व व्यावसायिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली  होती मात्र ती आता विदेशी भारतीयांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी अंशतः सुरु करण्यात अली आहेत.

सर्वसामान्य देशी भारतीयांचे प्रचंड हाल 

दरम्यान लोकडाऊनच्या काळात विविध राज्यात आणि शहरात अडकलेल्या सर्वसामान्य भारतीय प्रवाशांसाठी आणि मजुरांसाठी मात्र कुठलीही सुविधा न केल्यामुळे यांचे मात्र प्रचंड हाल होत असूनही ऑडी सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आता तर ३० जून पर्यंतची बुकिंग रेल्वेने रद्द केल्यामुळे  या प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यानच्या काळात मोदीसरकारने देशातील १५ स्टेशनवरून ३० वातानुकूलित गाड्या सुरु केल्या आहेत परंतु  या गाड्यांचे दर सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना परवडणारे नाहीत. याशिवाय देशातील विविध राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या असल्या तरी त्यात अनेक अटी -शर्तींमुळे मजुरांना पायी प्रवासावाचून पर्याय राहिला नाही. राज्य सरकारकडून  मात्र आता कुठे त्यांच्यासाठी बसची व्यवस्था केली असली तरी अर्ध्याहून अधिक लोक आपापल्या गावाकडे पायी गेले आहेत.

नवी दिल्ली स्टेशनबाहेर गर्दीच गर्दी …

रेल्वे सेवा अंशत: सुरू केल्यानंतर येथील स्टेशनवर अनेक लोक दाखल झाले. मात्र, पुढील प्रवासासाठी त्यांना सुविधा नसल्याने अनेक लोक नवी दिल्ली स्टेशनबाहेरील रस्त्यांवर बुधवारी अडकून पडले. अहमदाबाद, पाटणा आणि मुंबईवरून आलेल्या विशेष रेल्वे बुधवारी सकाळी नऊच्या आधी नवी दिल्ली स्टेशनवर दाखल झाल्या. मात्र, या प्रवाशांना पुढे जाण्यासाठी बस, कॅब किंवा इतर प्रवासी सेवा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेकजण नातलगांची वाट पाहात स्थानकाबाहेर उभे असल्याचे आढळले.

अमेरिकेत अडकलेल्या २८ हजार भारतीयांनी मायदेशी परतण्याची इच्छा

अमेरिकेतील डल्लास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २४० भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान बुधवारी निघाले. या प्रवाशांमध्ये विद्यार्थी, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू म्हणाले, ‘अमेरिकेत अडकलेल्या २८ हजार भारतीयांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात न्यूयॉर्क, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन डीसी या शहरांतून सात विमाने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात याच शहरांतून आणखी सात विमाने सोडली जातील, असे त्यांनी सांगितले.

कोरोना साथीमुळे ऑस्ट्रेलियात अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी २१ मे ते २८ मे दरम्यान सात विमाने सोडली जाणार आहेत. कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने बुधवारी ही माहिती दिली. ‘वंदे भारत’ मोहिमेअंतर्गत या भारतीयांना मायदेशी आणले जाईल. सीट मर्यादित असल्याने गरजवंतांना प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झालेल्या प्रवाशाने २४ तासांच्या आत तिकीट खरेदी केले नाही, तर संबंधित तिकिट दुसऱ्या प्रवाशाला देऊ केले जाईल.

मंगळुरूत १७७ जण परतले

दुबईहून १७७ भारतीयांना घेऊन आलेले विमान मंगळवारी रात्री मंगळुरूत उतरले. यामध्ये ३८ गर्भवती आणि १२ गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. एकूण प्रवाशांपैकी ८८ पुरुष, ८४ महिला, पाच मुले आणि दोन नवजात बालके आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स ३८४ विमान या प्रवाशांना घेऊन मंगळवारी रात्री दाखल झाले, असे विमानतळावरील सूत्रांनी सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!