AurangabadCrime : विषम तारखेला दुकाने चालू ठवणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा, रिकामटेकड्यांचा रस्त्यावर सुळसुळाट
पोलीस आयुक्तांनी जरी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून विषम तारखेला मटणासह इतर किराणा दुकाने उघडून ग्राहकांना विक्री करत असलेल्या दुकानदारांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय रिकामटेकड्यांचा देखील रस्त्यावर सुळसुळाट वाढला आहे. तोंडाला मास्क न लावता फिरणा-या दुकानदारांसह रिकामटेकड्यांवर संबंधीत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने सम व विषम अशा दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहे. येत्या १७ मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सम तारीख निवडण्यात आली आहे. तर विषम तारखेला केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. तरी देखील विषम तारखेला दुकाने उघडून तसेच मास्क न वापरता वस्तूंची विक्री केली जात आहे. त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जात आहे. मात्र, नागरिकांकडून नेहमी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. सोमवारी विषम तारीख असताना दुकाने उघडून शहरातील काही दुकानदारांनी साहित्यांची विक्री केली. त्यांच्याविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये राजकुमार मनमोहन मालाणी (रा. राजाबाजार), इस्तियाक अहेमद बिबन कुरेशी (रा. बुढीलेन, नेहरु भवनसमोर), अब्दुल रहिम अब्दुल जब्बार, महंमद अस्लम (दोघेही रा. कामाक्षी चौक), फैजान खान रशीद खान (१९, रा. लोटाकारंजा), कल्पेश रमेश पतके (२७, रा. संभाजी चौक, बेगमपुरा), एकनाथ काशीनाथ ढोकरट (५८, रा. विद्युत कॉलनी, बेगमपुरा), शेख जमशेद शेख इसरार (५२, रा. शांतीपुरा, नंदनवन कॉलनी), अब्दुल खलीफ मोहंमद यासीन कुरेशी (४५, रा. चिकलठाणा, मोतीवाला कॉलनी), शेख फेरोज शौकत कुरेशी (३८, रा. रोशन मशिदजवळ, किराडपुरा), शायद खान हमीद खान (२१), शायद खान हमीद खान (२२, दोघेही रा. गरमपाणी) यांचा समावेश आहे.
क्वारंटाईन असताना बाहेर फिरणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मध्यप्रदेशातून शहरात परतलेल्या बन्सीलालनगरातील एकाला क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरी देखील तो घराबाहेर फिरताना निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितेश संतोष धानुका (२७, रा. बन्सीलालनगर) हा नुकताच मध्यप्रदेशातून आला आहे. त्याची गोळवाडी नाक्यावर तपासणी व स्क्रिनींग करण्यात आली होती. त्याचवेळी त्याला १८ मेपर्यंत क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण त्यानंतरही तो बन्सीलालनगरातील घरात आढळुन आला नाही. त्यामुळे त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.