#CoronaVirusMaharashtraUpdate : जाणून घ्या महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या….
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजारांहून अधिक झाली असली तरी राज्यातील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात ८४१ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या १५,५२५ झाली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे आज ३५४ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८१९ आहे. गेल्या २४ तासांत ३४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २६ रुग्ण हे मुंबईचे आहेत. एका दिवसातील मुंबईतील मृत्यूचा हा आकडा सर्वाधिक आहे. पुण्यातील सहा रुग्णांचा, तर औरंगाबाद आणि कोल्हापूर शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ६१७ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
या बाबत अधिक माहिती देताना टोपे म्हणाले कि , आज झालेल्या ३४ मृत्यूंपैकी २४ पुरुष आणि १० महिला रुग्ण आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील १४ रुग्ण, ४० ते ५९ वयोगटातील १६ रुग्ण आणि चार रुग्ण ४० वर्षाखालील आहेत. यापैकी २८ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार होते. मुंबई महापालिका हद्दीतील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ९ हजार ९४५ झाली असून, आजातागायत मुंबईत करोनाबळींची संख्या ३८७ झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत करोनाबाधित एकूण रुग्णसंख्या १ हजार ८३६ असून, पुण्यात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला, असंही त्यांनी सांगितले. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणली जात आहे. राज्यात सध्या ९४३ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून, आज एकूण ११ हजार ६२९ सर्वेक्षण पथकांनी काम केले. या पथकांनी ५०.८१ लोकांचे सर्वेक्षण केले आहे, असेही टोपे यांनी सांगितले.