Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Maharashtra #CoronaVirusUpdate : राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,६६६, दिवसभरात ९ जणांचा मृत्यू : राजेश टोपे

Spread the love

देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती बरी होत असल्याच्या बातम्या असतानाच आज सोमवारीही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असून, दिवसभरात ४६६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता ४ हजार ६६६वर पोहोचली आहे. आज राज्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात सात जण मुंबईतील असून, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात दोन रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २३२ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान आज ६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आजपर्यंत एकूण ५७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले असून, ४ हजार ६६६ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६४ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५ हजार ६४८ सर्वेक्षण पथकांनी २१ लाख ८५ हजार इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे करोना रुग्णांच्या विश्लेषणाविषयी अधिक माहिती देताना म्हणाले कि ,  या विश्लेषणात  काही बाबी समोर आल्या आहेत. राज्यातील २ हजार ३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता, त्यापैकी १ हजार ८९० म्हणजे ८१ टक्के रुग्ण हे लक्षणरहित आहेत. तर ३९३ रुग्णांना म्हणजे १७ टक्के रुग्णांना लक्षणे असून, या रुग्णांपैकी ५३ रुग्ण म्हणजेच दोन टक्के रुग्ण हे अतिदक्षता विभागात भरती आहेत, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. आज झालेल्या नऊ मृत्यूपैकी सहा पुरुष आणि तीन महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील पाच रुग्ण, तर ४० ते ६० वयोगटातील एक रुग्ण आणि ४० वर्षाखालील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मालेगाव शहरातील मृत्यूमुखी पडलेल्या दोन रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. उर्वरित सात जणांमध्ये पाच रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार असल्याचे समोर आले आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!