#CoronaVirusLatestUpdate : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १४ हजारावर तर मृतांची संख्या ४८८, २०१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले…
देशातील काही भागांमध्ये कोरोनाची तीव्रता हळूहळू कमी होत असल्याचा सकारात्मक ट्रेंड समोर आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या माहितीनुसार देशातील २३ राज्यांमधील ४७ जिल्ह्यांत गेल्या २८ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही तर इतर ४५ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. हे असे जिल्हे आहेत जिथे सुरुवातीला करोनाचे रुग्ण आढळून आले होते.
देशातील करोना रुग्णांची संख्या १४,७९२ झाली. गेल्या २४ तासांत ९९१ नवे रुग्ण आढळले तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील मृतांची एकूण संख्या ४८८ इतकी झाली आहे. करोनाचे एकूण २०१५ रुग्ण बरे झाले आहेत.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण १४३७८ रुग्णांपैकी ४२९१ रुग्ण (२९.८ टक्के) हे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी संबंधित आहेत. २३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये तबलीघीचे रुग्ण आहेत. यातील ८४ टक्के रुग्ण तामिळनाडूत, दिल्लीत ६३ टक्के, ७९ टक्के तेलंगण, ५९ टक्के उत्तर प्रदेश आणि ६१ टक्के आंध्र प्रदेशात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर ३.३ टक्के इतका आहे. यात वयाच्या विभागणीनुसार वेगगेवळी टक्केवारी समोर आली आहे. ४५ वयापर्यंतच्या रुग्णांचे १४.४ टक्के, ४५ ते ६० वयाच्या रुग्णांचा १०.३ टक्के ६०-७५ वयोगाटातील रुग्णांचा ३३.१ टक्के आणि ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू दर हा ४२.२ टक्के इतका आहे.
करोना व्हायरसमुळे अडकून पडलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदतवाढ विनाशुल्क असून ती लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजे ३ मेपर्यंत वाढवली गेली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. ज्या विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. आणि ज्यांच्या व्हिसाची मुदत लवरच संपणार आहे अशा विदेशी नागरिकांनी व्हिसा मुदतवाढीसाठी अर्ज करावा, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.