Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : चर्चा तर होणारच !! म्हणून आलो….महाराष्ट्राचा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट…

Spread the love

चर्चा तर होणारच !! म्हणून आलो…. अशी सुरुवात करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी  संवाद साधला. राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा आज, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हा लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असा धीर देताना मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले कि , माझ्या महाराष्ट्रात तरी मी १४ एप्रिल नंतर लॉकडाऊन चालूच ठेवणार.

ते म्हणाले कि ,  महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहेत ही चिंतेची बाब असली तरी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३३ हजार तर मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. यातल्या ६० ते ७० टक्के लोकांमध्ये सौम्य ते अती सौम्य लक्षणे असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांची संख्या जास्त आहे अशी माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार अशी घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. त्याबाबत १४ तारखेला नियम काय असतील ते १४ तारखेपर्यंत  सांगेल असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , शक्यतोवर घरात राहा . बाहेर पडूच नका आणि काही कामांसाठी बाहेर पडलात तर मास्क बांधा आणि काळजी घ्या. ५ तारखेला   महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडून ५ आठवडे होतील. पण हा आकडा आपल्याला शुन्यावर आणायचा आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणं नाहीत असेही रुग्ण सापडत आहेत. देशात कोरोना रुग्णांना आकडा वाढतो आहे. आज ही संख्या ७ हजार ४००च्या वर गेली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. देशात ५८६ कोव्हिड हॉस्पिटल्स तयार झाले असून १ लाख आयसोलेशन बेड्सही तयार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाय योजना केल्या नसत्या तर देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा हा 2 लाखांच्यावर गेला असता असंही त्यांनी सांगितलं. देशात डॉक्टरांसाठी PPE किटची आणि औषधांची कमतरता नाही. त्याचं देशातही उत्पादन सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. २४ तासांमध्ये नव्या रुग्णांची संख्या १०३५ वर गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  २४  मार्चला रात्री ८ वाजता राष्ट्राला उद्देशून एक संदेश दिला आणि त्याच दिवशीच्या मध्यरात्रीपासून २१ दिवसाचा देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. आता हे २१ दिवस येत्या १४ तारखेला संपत आहेत. देशात Coronavirus ची साथ अद्याप आटोक्यात आल्याची चिन्हं नाहीत. त्यामुळे आता हा लॉकडाऊन उठण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला उद्देशून काही संदेश देतील अशी शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!