Aurangabad News Update : औरंगाबादेतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा मोठा अभाव , खुर्च्यांना चिकटलेले असे “साहेब” लोक औरंगाबादेत पहिल्यांदाच आले….
संपूर्ण देश आणि राज्य कोरोनाच्या काळजीने ग्रस्त असताना आणि इतर जिल्ह्यातील अधिकारी सदैव जनतेच्या सेवेत असताना औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात काय चालू आहे ? हे कळायला मार्ग नाही. खरे तर औरंगाबाद हे मराठवाड्याचे विभागीय ठिकाण आहे . त्यामुळे औरंगाबाद शहरात विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त , विशेष पोलीस महानिरीक्षक , पोलीस आयुक्त , जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण असे अनेक मह्त्वाचे अधिकारी औरंगाबाद शहरात आहेत . याशिवाय आरोग्य विभागाचे उप संचालक , शासकीय वैद्यकीय महावियालयाचे अधिष्ठाता , घाटी रुग्णालयाचे अधीक्षक , जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद , महा पालिका आरोग्य अधिकारी असे अनेक उच्च पदस्थ पदाधिकारी कागदोपत्री कार्यरत आहेत. परंतु कोणाचे काय चालले आहे ? याचा काहीही ताळमेळ नाही. अर्थात याबद्दल ना कोणाला खंत आहे ना कोणाला खेद !!
औरंगाबादने अनेक अधिकारी पहिले ज्यांना ते कोणत्याही गल्लीत उभे राहिले तरी लोक त्यांना प्रत्यक्ष चेहऱ्याने ओळखत होते आताच्या अधिकाऱ्यांना ते अमुक -तमुक अधिकारी आहेत हे सांगूनही लोकांना पटणार नाही आणि त्यांच्या सोबत सरकारी गाडी , कर्मचारी अधिकारी नसतील तर त्यांना कोणी ओळखणारही नाही. आपला एक चेहरा असावा हे या अधिकाऱ्यांच्या गावीही नसावे याचे आश्चर्य वाटते. तात्पर्य असे दिव्य आणि कर्तबगार अधिकारी औरंगाबादला कधीही लाभले नाही.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री , स्वतः मुख्यमंत्री , गृहमंत्री दररोज जनतेसमोर आपला अहवाल सादर करीत आहेत. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण २४ x ७ जनतेच्या सेवेत असल्याचे म्हटले आहे. परंतु औरंगाबादचे कुठलेही अधिकारी दिलेल्या फोनवर उपलब्ध होत नाहीत. दिलेल्या WhatsApp नंबरवर टाकलेल्या मॅसेजचे कधीही उत्तर देत नाहीत किंवा कुठल्याही मॅसेजची दखल घेत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. शासनाने याची गंभीर दाखल घेण्याची गरज आहे. या पूर्वी असे अधिकारी कधीही औरंगाबाद शहरात नव्हते.
राज्यात कोरोनाची साथ चालू झाल्यानंतर विभागीय आयुक्त, जिलाधिकारी , आरोग्य अधिकारी यांनी आजपर्यंत कधीही एकत्रित बैठक घेऊन औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची काय स्थिती आहे हे सांगितले नाही. किंवा एखादा अपवाद वगळता विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यात कोरोनाची काय अवस्था आहे ? याची दैनंदिन माहिती दिली नाही. त्यामुळे औरंगाबादची कोरोनाग्रस्तांची आकडेवारी भिन्न भिन्न आढळून येते. डॉ . सुंदर कुलकर्णी नावाचे आरोग्य अधिकारी तिकडे मिनी घाटीतून एक माहिती देतात, महापालीकेच्या आरोग्य अधिकारी स्वतंत्र माहिती देतात, महापौर फेसबुक लाईव्ह करतात, कधी कधी घाटीतून एखादी माहिती येते . जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त कधी तरीच बोलतात. पोलीस आयुक्त आणि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक मात्र आपापल्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. औरंगाबादचा सरकारी कारभार असा चालू आहे . याचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार ? मोठा प्रश्न आहे.
मिनी घाटीत आज ६५ रुग्णांची तपासणी
जिल्हा माहिती कार्यालयाने त्यांच्या फेसबुकवर दिलेल्या चार ओळीच्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे कि , जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज ६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३२ जणांचे लाळेचे नमुने कोरोनासारखी लक्षणे आढळल्याने घेऊन तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आले, असे मिनी घाटीचे डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. काल आणि आजचे मिळून ४० तपासणी अहवाल अप्राप्त आहेत. काल रात्री उशिरा दोघा जणांचे अहवाल सकारात्मक तर ४१ जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. दोघांचे अहवाल सकारात्मक आल्याने आता एकूण १७ कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४१ रुग्णांना त्यांच्यावर पूर्ण उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. देखरेखीखाली ७६ रुग्ण असल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
महापालिकेकडून आज कुठलीही माहिती नाही !!
खरे तर शहरातील आरोग्यविषयक काय माहिती आहे ? याची माहिती देणे महापालिकेचे कर्तव्य आहे परंतु महापालिकेचे काय चालू आहे ? आयुक्तचे काय चालू आहे ? महापालिका आरोग्य विभागाचे काय चालू आहे ? याविषयी कुठली माहिती देण्यात येत नाही.
शासकीय आकड्यात तफावत
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचे जे आकडे माध्यमात प्रसिद्ध होत आहेत त्यात कुठेही सुसूत्रता नाही. महाराष्ट्र टाईम्स ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी मध्ये
औरंगाबाद – ३
औरंगाबाद महापालिका – १६ (मृत्यू १)
औरंगाबाद मंडळ – एकूण २१ (मृत्यू १)
या विस्कळितपणातून काय लक्षात येते ते कळत नाही.
जालना – १
हिंगोली – १
परभणी – ००
परभणी मनपा – ००
लातूर – ००
लातूर महापालिका – ८
उस्मानाबाद- ४
बीड – १
नांदेड- ००
नांदेड मनपा – ००
लातूर मंडळ एकूण- १३