#CornonaVirusUpdate : ‘कोरोना’ च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करा : अजित पवार
‘राज्यात आज सात नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३ झाली आहे. जनतेने घरातंच थांबून योग्य काळजी घेतल्यास, खरेदीची गर्दी टाळल्यास, विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचे पालन केल्यास आपण निश्चितपणे ‘कोरोना’ला रोखू शकतो. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करुया, राज्यातील ‘कोरोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समूहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘करोना’ संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान बेजबाबदार वागून इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देताना त्यांनी म्हटले आहे कि , सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील २४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यापाऱ्याने आजारी असताना मेरठपर्यंत रेल्वेप्रवास केल्याचं उघड झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांचाही आता शोध सुरू आहे. इतरांचा जीव धोक्यात घालणारा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शासनाने वारंवार सांगूनही मुंबई, नवी मुंबई, राज्यातील अनेक शहरांच्या बाजारपेठेत आजही खरेदीसाठी गर्दी होते आहे. यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यातील करोना रुग्णसंख्या मर्यादित ठेवायची असेल तर, प्रत्येकाने ‘लॉकडाऊन’चे पालन करून घरातंच थांबावे. खरेदीसाठी गर्दी करू नये. परराज्यातील मजुरांनी आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. ‘करोना’विरुद्धच्या लढ्यात काम करत असलेले डॉक्टर, आरोग्य, पोलिस, महसूल, बँक कर्मचारी तसेच शासनाच्या विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. शासकीय यंत्रणा ‘करोना’विरुद्धच्या लढ्यासाठी तयार असल्याचा विश्वास राज्यातील जनतेला दिला आहे. ‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी हजार शासकीय व खासगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे उपचार केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.