Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : करोनमुळे देशात ९ वा मृत्यू , पंतप्रधानांनी केले जनतेला “हे ” भावनिक आवाहन !! लोकसभाही स्थगित….

Spread the love

देशातील कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक प्रयत्न केले जात असतानाही लोकांचे फिरणे कमी होत नसल्याने हताश होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्य सरकारांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. काही लोक लॉकडाऊनला गांभिर्याने घेत नाहीत, कृपया स्वत:ला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गांभिर्याने पालन करा असे आवाहन भारतीय जनतेला केले आहे. दरम्यान उद्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून फक्त कार्गो विमानांची वाहतूक सुरू  ठेवण्याचा निर्णय केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाने  (DGCA) घेतला आहे. देशात करोनामुळे ९ वा मृत्यू पश्चिम बंगालमध्ये झाला असून या व्यक्तीचे वय  ५५ वर्ष आहे. संसदेतही लॉकडाऊन करण्यात येत असून लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत आहे. देशातील २२ राज्यांमधील ८० शहरांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४१५ वर पोहोचली.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही आता केवळ अत्यंत महत्वाच्या प्रकरणावरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुनावणी होणार असून उदया संध्याकाळी ५ वाजल्यानंतर कोणालाही प्रवेश मिळणार नाही. देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी राज्यात आजपासून कलम १४४ लागू करण्यात आले असतानाही रस्त्यांवरील वर्दळ कमी होत नसल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसंगी कर्फ्यू लावला जाईल, असे स्पष्ट शब्दांत बजावले आहे. करोनाच्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून ३१ मार्चपर्यंत कलम १४४ लावण्यात आले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन आपण कृपा करून घराबाहेर पडू नये, अशी माझी सर्वांनाच विनंती आहे. सरकारला आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मी करत आहे. मात्र, आपण सहकार्य न केल्यास, निर्बंध न पाळल्यास, राज्यात कर्फ्यू लावण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्यापुढे उरणार नाही, असा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे. देशमुख यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून राज्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली असतानाही सर्वच महानगरांमध्ये आज रस्त्यांवर वाहनांची तसेच लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देशमुख यांनी हा व्हिडिओ जारी केला आहे.

देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहेत. या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी राज्यात जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, बँका, वित्तीय संस्था सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. हे निर्बंध असतानाही आज सकाळपासूनच मुंबई, पुणे, नागपूरसह सर्वच महानगरांत मोठ्या प्रमाणात वाहने तसेच लोकही रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी तर पोलिसांना सक्तीने वाहनांना अटकाव करावा लागला. अनेक बाजारपेठाही राजरोस सुरू होत्या. ही स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकार सर्वत्र कर्फ्यू लावण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!