Corona Virus Update : व्हायरस तर व्हायरस पण इथे माणसंही उठताहेत माणसांच्या जीवावर !! अफवांचा व्हायरस थांबवा …
सर्व जग कोरोना व्हायरसमुले त्रस्त असताना लोकांना कोरोनामुळे अनेक बरे वाईट अनुभव येत आहेत. देशातही अशाच काही दिलासा देणाऱ्या तर काही माणुसकीला हरताळ फासणाऱ्या बातम्या येत आहेत. सरकारकडून लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले जात असतानाच कोरोनाची लग्न झालेल्या रुग्णांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर , कुटुंबियांवर बहिषकर टाकण्याचे प्रकार घडत आहेत. दिल्लीत तर कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास दोन स्मशानभूमीत मज्जाव करण्यात आला . शेवटी प्रशासनाने पुढाकार घेऊन मयतावर अंत्यसंस्कार केले . मुंबईत, सोलापूर आणि कोट्टायम येथेही असेच प्रकार घडले आहेत. दरम्यान एरवी टीकेचे धनी होणारे हजारो शासकीय डॉक्टर आणि नर्स मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून मानवतेची सेवा करीत असल्याचे प्रशंसनीय चित्र आहे आणि हा दिलासा खूप मोठा आहे.
महाराष्ट्रातील पहिला पकार सोलापूर जिल्ह्यात घडल्याचे आढळून आले त्याचे झाले असे कि , पुण्यात काही जणांना कोरोना झाल्याची बातमी धडकताच पुण्यातील एका रुग्णाचा भाऊ तत्काळ सोलापूरहून आपल्या भावाला भेटण्यासाठी पुण्याला आला आणि परत गावाकडे गेला तेंव्हा त्याच्या गावातील लोकांनी त्याला गावात राहण्यास मज्जाव केला आणि सांगितले कि , गाव सोडून निघून जा. त्यानंतर त्याला समजले कि , वृत्तपत्रांनी त्याच्या भावाला कोरोना झाल्याचे नावानिशी जाहीर केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर प्रशासनाने माध्यमांना कोरोनाग्रस्तांची ओळख न चहापाण्याच्या सूचना दिल्या. पुण्यातही एका सोसायटीच्या लोकांनी परदेशातून घरी परतणाऱ्या नागरिकांना सोसायटीत परत घेण्यास मज्जाव केला. इतकेच नव्हे तर पोलिसात अर्जही दिला परंतु पोलिसांनी सांगितले कि , ज्यांचे घर आहे त्यांना त्यांच्या घरात जाण्यास रोखणारा कोणताही कायदा नाही . स्वतःची काळजी घेणे वाईट मुळीच नाही पण ज्यांचा या व्हायरसशी सामना होत आहे त्यांच्याशी असे वागताना इतके कसे आम्ही माणुसकी शून्य झालो आहोत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बरा झाल्यानंतर मी भारतात राहणार नाही….
देशभर अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नातेवाईकांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटाशी झुंज देणाऱ्या कोट्टायम मधील एका दाम्पत्याला याच कारणावरून सोशल मीडियावरील टीकाही सहन करावी लागत आहे. दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करण्यास प्रतिबंध असतानाही अनेकांनी सोशल मीडियावर या रुग्णांची नावे जाहीर केल्याची घटना कोट्यायम येथे घडली आहे. येथील Covid – 19 चा रुग्ण मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे दाखल आहे. सोशल मीडियावर त्यांच्या व कुटुंबीयांविरोधात केल्या जाणाऱ्या टीकेमुळे त्रस्त असल्याची भावना या रुग्णाने व्यक्त केली. एकदा माझी तब्येत सुधारल्यानंतर मी भारतात राहणार नाही, मी परदेशात निघून जाईन, असे या रुग्णाने म्हटले असून टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतीतचे वृत्त छपले आहे. पती ,पत्नी व एक लहान मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. यापैकी पती – पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या मुलीची टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. इटलीहून आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वीच लोकांची भेट घेतली म्हणून या दाम्पत्याविरोधात सोशल मीडियावरुन टीका केली जात आहे.
आम्ही मुंबईकर स्पिरिट जाते आहे….
मुंबईतही अशीच एक धक्कादायक माहिती टीव्ही माध्यमांनी उघडकीस आणली आहे. या वृत्तानुसार मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या सोसायटीवरच बहिष्कार घातल्याचं उघडकीस आलं आहे. स्पीरिट ऑफ मुंबई म्हणणाऱ्या मुंबईत ही असंवेदनशील घटना समोर आली आहे. मानवतेच्या दृष्टीतून कोरोनाग्रस्त असलेल्या नागरिकांना मदत करणे तसेच त्यांच्या कुटुंबाला धीर देणे गरजेचे आहे. परंतु या उलट मुंबईत मात्र कुटुंबच नाही तर जिथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत, त्या संपूर्ण सोसायटीवर बहिष्कार घातला आहे. घाटकोपर येथील इमारतीमधील एक कुटुंब कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासन आणि इतर यंत्रणांनी त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण इमारतीचं निर्जंतुकीकरण केलं. तसेच येथील कर्मचारी आणि नागरिकांची तपासणी देखील केली होती. मात्र या सोसायटीवर आता आजूबाजूच्या सोसायटींनी बहिष्कार घातला आहे.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी काम करण्यास गेल्यास इतर ठिकाणी कामासाठी येण्यास मनाई केली आहे. तसेच सेवा देण्यास गेलेल्या लोकांना इतर इमारतींमध्ये प्रवेश नाकारल्याने इथले नागरिक गेले सहा दिवस त्रस्त झाले आहेत. यात बहिष्कार घातलेल्या सोसायटीतील नागारिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. मुंबईतील ही घटना अत्यंत निंदनीय असून यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अफवांचा व्हायरस थांबविण्याची गरज
याशिवाय आणखी एक मोठी समस्या आहे सोशल मीडियावर बिनपगारी कार्यरत असणाऱ्या सोशल वारीअर्सची !! आपल्या देशातील अनेक रिकामटेकडे लोक सोशल मीडियाच्या वापरातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्याचे महान कार्य करीत आहेत अशा काही वीरांविरुद्ध पुण्यात आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून इतरांनी यापासून धडा घेण्याची गरज आहे. म्हणून आपल्यापर्यंत येणार मॅसेज वाचून तो फॉरवर्ड करण्यापेक्षा डिलिट करण्याची सवय लावून घेणेसुद्धा सध्याच्या परिस्थितीत महत्वाचे आहे. हा अफवांचा व्हायरस आपण थांबवू शकलो तरी खूप मोठे काम होईल. प्रत्येकाने याची खबरदारी घेणे महत्वाचे आहे.