Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Maharashtra Update : राज्यातील सर्व निवडणूक ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची आयोगाकडे शिफारस, सर्व परीक्षा पुढे ढकलल्या…

Spread the love

राज्यातील सर्व निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे तसेच राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात  आल्या असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३८ झाली असली तरी सर्व स्तरावर सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्रात अजून चार जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामधील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. यामधील दोन जण कुटुंबाच्या संपर्कात आले तर इतर दोघेजण परदेशात प्रवास करुन आलेले आहेत”. पनवेलमधील विलगीकरण कक्षात ३३ जणांना ठेवण्यात आलं असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. कोणीही पळून गेलेलं नसून चुकीची अफवा पसरली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांना माणुसकीची वागणूक देण्याचे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांची बैठक , घेतले महत्वपूर्ण निर्णय 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांशी चर्चा करणार आहेत. चांगले निकाल यावेत यासाठी अजून काही काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्य विभागाची बैठक पार पडली असून फक्त शहरी भागातील नाही तर ग्रामीण भागातील शाळाही बंद केल्या पाहिजेत. तसंच सर्व परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत यावर सर्वांचं एकमत झालं. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी कशी कमी करता येतील यावरही चर्चा झाली. खासगी कंपन्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला पाहिजे यावरही चर्चा झाली. नवे काही आदेश दिले पाहिजेत का ? यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत सहली किंवा व्यावसायिक दौऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. खासगी सहल कंपन्या (टूर ऑपरेटर) किंवा व्यक्तींना असे दौरे ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. मॉल्स, सिनेमागृहे, नाटय़गृहे, शाळा-महाविद्यालये याबरोबरच संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून मुंबईत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.

कोरोना संशयितांची विलगीकरण 

दरम्यान मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात असलेल्या एका रुग्ण करोनाग्रस्त आहे हे समजल्यानंतर तिथल्या ९० कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं असून त्यांचं घरातच विलिगीकरण करण्यात आलं. जो रुग्ण करोनाग्रस्त असल्याचं समजलं आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जे कर्मचारी हाय रिस्क वाटत आहे त्यांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या या दोन नर्स आहेत ज्यांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात आलं आहे. तर जे कर्मचारी लो रिस्क वाटत आहेत त्यांना घरी पाठवून त्यांचं विलिगीकरण करण्यात आलं आहे. घरीच त्यांना काळजी घेण्याचा आणि घरातल्यांपासून वेगळं राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे. मुंबई मिररने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

करोनाग्रस्त रुग्णावर जे डॉक्टर आणि ज्या परिचारिका उपचार करत होत्या आणि त्याच्या संपर्कात येत होत्या त्यांना हाय रिस्क समजलं जातं आहे. सध्या वेगळ्या कक्षात दोन नर्सेसना ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर ८५ जण हे लो रिस्क आहेत त्यांना घरी पाठवण्यात आलं असून त्यांचं विलिगीकरण करण्यात आलं आहे. ज्या रुग्णाला करोनाची लागण झाल्याचं समजलं आहे त्याची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. तसंच त्याला देखरेखीखालीही ठेवण्यात आलं होतं. त्याला करोनाची लागण झाल्याचं समजताच कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशीही माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील दोन रुग्णांवर यशस्वी उपचार , पाठवले घरी 

करोना व्हायरसमुळे सध्या देशात भितीचं वातावरण असून यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी आली आहे. दिल्लीत करोना व्हायरसची लागण झालेल्या दोन रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत आतापर्यंत करोनाची सात प्रकरणं समोर आली आहेत. यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने दाखल करुन घेण्यात आलेल्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

करोना व्हायरस संसर्गजन्य असल्याने या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना पूर्णपणे वेगळे ठेवण्यात येते. करोनाची बाधा झालेल्या रुग्णांचे विलगीकरण करण्यात येते. आयसोलेशन म्हणजे विलगीकरण करण्यात आल्यानंतर हे रुग्ण काय करत असतील? कसा आपला वेळ घालवत असतील? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहेत. त्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!