हृदयद्रावक : “बळीराजा नको करु आत्महत्या..”अशी कविता लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनीच केली आत्महत्या !!
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्याने “बळीराजा नको करु आत्महत्या..” अशी कविता लिहिली त्याच्याच वडिलांनी त्याच रात्री आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडल्याचे वृत्त आहे. या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून एक कविता रचून ती वर्गात सादर केली होती. पण त्याच्याच वडिलांनी संध्याकाळी विष प्राशन करुन आत्महत्या केली. पाथर्डी तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमान नगर येथे तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रशांत बटुळे याने बुधवारी आपल्या वर्गात एक कविता सादर केली. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये म्हणून ही कविता त्याने रचली होती. मात्र त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. या विषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशांतच्या कवितेतल्या काही ओळी अशा आहेत….
शेतात कष्ट करुनही तुझ्या डोक्याला ताप,
बळीराजा नको करु आत्महत्या..
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे,
कसे उन्हात करतात शेती, पिक उगवणी करुन मिळतात पैसे
शेती करुनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा नको करु आत्महत्या