Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : लखनौच्या सभेत पवारांनी डागली मोदी सरकारवर तोफ

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या मेळाव्यात बोलताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि , राम मंदिर बांधण्यासाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना केली, मग मशिद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवता आली नाही ? या वेळी बोलताना पवारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या धोरणांना टीकेचं लक्ष्य केलं.  देश तर सर्वांचा आहे आणि सर्वांसाठी आहे, असं म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

दिल्लीत आज राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे वक्तव्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील पक्षाच्या राज्य परिषदेत ते बोलत होते. दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. पवारांनी आदित्यनाथ यांच्या अर्थसंकल्पावरही टीका केली. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीच नाहीए. तसंच आदित्यनाथ सरकारने तरुणांना रोजगार देण्याचं कुठलंही आश्वासन दिलं नाही, अशी शरद पवार म्हणाले.

उत्तर प्रदेशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालल्याचं शरद पवार म्हणाले. इथल्या तरुणांवर महाराष्ट्रासह दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या योजनांमुळे जनता त्रासली आहे. त्यामुळे आता त्यांच्या हातातून राज्ये निसटत चालली आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनी प्रचार करूनही दिल्ली भाजपला जिंकता आली नाही. केजरीवालांसमोर त्यांचा निभाव लागला नाही असं शरद पवार म्हणाले.

यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले कि , भाजपकडून फोडा आणि राज्य करा नीती वापरली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आता जनतेला त्यांचे डाव समजले आहेत. त्यांच्या बोलण्यात लोक अडकणार नाहीत. सीएए आणि एनआरसीमध्ये अनेक त्रुटी आहेत. यात अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचंही शरद पवार यांनी सांगितले. भाजप जातीयवाद निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार जर मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करू शकतं तर मशिदीसाठी निधी उभारून ट्रस्ट का स्थापन करत नाही? असा प्रश्न पवारांनी केला. भाजपचं फूटीचं राजकारण करत आहे. सीएए हे त्याचं उघड उदाहरण आहे, असं पवार म्हणाले.  केंद्रातही भाजपविरोधी पक्षांनी एकजूट होऊन भाजपला सत्तेतून हद्दपार करावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!