आर्थिक अडचणीतून पत्नीची हत्या करून पती बेपत्ता , आत्महत्या करणार असल्याची चिट्ठीत दिली सूचना…
आर्थिक अडचणीमुळे कर्जाची परतफेड करता न आल्याने एका व्यावसायिकाने त्याच्या आजारी पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धंद्यात आलेल्या नुकसानीमुळे कर्ज फेडता येत नाही. त्यामुळे आम्ही आमचं आयुष्य संपवत आहोत. आजारी पत्नीलाही एकटं सोडू शकत नाही, माझ्या मागे तिची काळजी घेणारं कोणी नसल्याने हे कृत्य करत आहे, असे या व्यक्तीने चिठ्ठीत म्हटले आहे. पत्नीच्या हत्येनंतर स्वत:ही आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेला हा व्यावसायिक चिठ्ठी लिहून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या विषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , पवईच्या शिवशक्ती नगरमध्ये सोमवारी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी ही घटना उघडकीस आली. शेजारील लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जेंव्हा पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा शीला लाड या ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह त्यांना घरात आढळला. पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना शीला लाड यांना मृत्यू पूर्वी मारहाण झाल्याचं आढळून आलं. शीला यांचा गळ्यावर व्रण आढळल्याने त्यांची हत्या गळा दाबून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी शीला लाड यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. दरम्यान, शीला यांचे पती अजित लाड फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान पोलिसांनी लाड यांच्या घरात अधिक तपास केला असता त्यांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात अजित लाड यांनी त्यांना व्यवसायात नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. वर्षभरात १. ८० लाखाचं कर्ज फेडू शकलो नाही. आम्ही कर्जात बुडालेलो असल्याने आमचं आयुष्य संपवत आहोत. माझी पत्नी आजारी असून तिला एकटं सोडून जाऊ शकत नाही. माझ्यानंतर तिची काळजी घेणारं कोणी नाही. आमच्या या कृत्याला कोणीही जबाबदार नाही, असं या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, शीला यांना काय आजार झाला होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, वृद्धापकाळामुळे त्या आजारी असल्याचं सांगण्यात येतं. घरात हे दोघेच पती-पत्नी राहत होते. त्यांना मुलं नाहीत. पोलीस अजित यांचा शोध घेत असून त्यांचा तपास लागल्यावरच या प्रकरणाची अधिक माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले.