डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपस्थिती
‘ एनसीएल’चे संचालक प्रा.अश्विनीकुमार नांगिया प्रमुख पाहुणे | १०५ ‘पीएचडी’धारकांना पदवी प्रदान करणार
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हिरक महोत्सवी दीक्षांत समारंभ मा.राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक प्रा.अश्विनीकुमार नांगिया यांच्या प्रमुख उपस्थित मंगळवारी (दि.११) होणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. माहिती देण्यासाठी व्यवस्थापन परिषद कक्षात सोमवारी (दि.दहा) पत्रकार परिषद झाली. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले १४ सप्टेंबर २०१९ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांच्या उपस्थितीत ५९ वा दीक्षांत समारंभ अत्यंत दिमाखात पार पडला. अवघ्या चार महिन्यानंतरच्या अवधित दुसरा दीक्षांत समारंभ होत आहे. समारंभास महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित राहून अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर प्रा. अशिनीकुमार नांगिया (संचालक, सीएसआयआर – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या नाटयगृहात मंगळवारी सकाळी १०:३० वाजता हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते कुलसचिव डॉ साधना पांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.गणेश मंझा, प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार जाधव यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित असतील. तर अधिसभा, विद्यापरिषदेचे सदस्य यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. पत्रकार परिषदेस प्रसिध्दी समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, सचिव संजय शिंदे, प्रा.पराग हासे, डॉ.लास अंभोरे, पंकज बेडसे आदींची उपस्थिती होती.
साठ हजार पदवीचे वितरण
दीक्षांत समारंभात ६० हजारहून अधिक पदवी, पदव्यूत्तर पदवी, पदविकांचे वितरण करण्यात येईल. यामध्ये पदव्यूत्तर प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्यूत्तर, पदवी एम.फिल, पीएच.डी आदींचा समावेश आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा २५ हजार ५७०, मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र १६ हजार ३१५, वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र ११ हजार ४२१ तर आंतरविद्याशाखीय विद्याशाखांचे ४ हजार ६२८ विद्यार्थी असणार आहेत. एकुण पदवीधारकांची संख्या ५९ हजार ९३४ असून पीएच.डी धारकांची संख्या १०५ असणार आहे.