मनसेच्या मोर्चाला परवानगी नाहीच , फक्त सभा घेण्याचे आदेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उद्या घुसखोरांविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. फक्त आझाद मैदानात सभा घ्या असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चे काढण्यास मनाई आहे. संवेदनशील आणि गजबजलेला भाग तसेच अनेक परदेशी दुतावास असल्याने दक्षिण मुंबईत मोर्चाकरता मनाई आहे. असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी मनसेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. मात्र मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान ‘चौक सभांमधून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास कारवाई करण्यात येईल,’ अशा नोटीसा पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना पाठवण्यात आल्या आहेत. कलम १४३,१४४आणि १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाईनुसार या नोटीसा पाठवल्या आहेत. पोलिसांच्या या भूमिकेनंतर मनसे नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही, मात्र आम्ही एक मोर्चा काढल्याने लगेच कसा प्रश्न तयार होतो?’ असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यामुळे मनसेच्या या महामोर्चाआधी वातावरण चांगलंच ढवळून निघत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीला काही कार्यकर्त्यांची धरपकडही होण्याची शक्यता आहे.