देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक , ६६ टक्के लोक झाले जगणे महाग !! महागाईचा दर गेल्या ६५ महिन्यातील उच्चांकी !!!
देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री कितीही नाही म्हणत असले तरी आयएएनएस सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार सामान्य माणसावर महागाई आणि आर्थिक मंदीचा डबल मारा होत असून सुमारे ६६ टक्के लोकांनी घर खर्च चालवायलाही नाकी नऊ येत असल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणात लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे त्यांचे दैनंदिन जगणेही महाग झाले असून त्याचा परिणाम प्रत्येक कुटुंबियांवर होत आहे.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आयएएनएस सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार, एकूण ६५.८ टक्के लोकांचं म्हणणं आहे की त्यांना रोजचा खर्च करणंही कठिण होत आहे. सर्वेक्षणानुसार, अर्थसंकल्पाच्या आधी केलेल्या या सर्वेक्षणात सध्याची लोकांची आर्थिक स्थिती, रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवताना होणारी अडचण समोर आली आहे. पगार वाढत नाही, मात्र खाद्यपदार्थांपासून सर्व गरजेच्या वस्तूंच्या किंमतीत गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांतला उच्चांकी आहे. विशेष म्हणजे २०१४ मध्ये युपीए सरकारच्या काळातही सुमारे ६९.९ टक्के लोकांनी सांगितलं होतं की त्यांना आपल्या खर्चाचं व्यवस्थापन करणं कठीण होतं. मात्र २०१५ च्या तुलनेत लोकांचा मूड आता आणखी वाईट आहे. चालू वर्षात लोकांमधील नकारात्मक दृष्टीकोनात वाढ झाली आहे.
सर्वेक्षणातील अधिकृत आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत बेसुमार वाढ झाल्याने डिसेंबर महिन्यातील महागाईचा दर ७.३५ टक्के हा गेल्या ६५ महिन्यातील उच्चांकी स्तर आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या ४,२९२ लोकांपैकी ४३.७ टक्के लोकांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की त्यांचं उत्पन्न एकसमानच राहिलं आहे आणि खर्च वाढला आहे, तर २८.७ टक्के लोकांच्या मते खर्च तर वाढले आहेतच पण उत्पन्न घटलं आहे.