चर्चेतली बातमी : फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय ? आणि फडणवीसांनी सरकारला काय दिले आव्हान ?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप केल्यामुळे या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापत आहे. मागील सरकारच्या काळात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा हा गंभीर आरोप संजय राऊत आणि शरद पवार यांनी केल्यानंतर टीका होऊ लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सरकारने चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर करावा असे थेट आव्हान दिले आहे. दिलंय. राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते ! असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले कि , या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठावूक आहे. तथापि, राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठावूक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी. फडणवीस सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेले दीपक केसरकर यांनीही राजकीय नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले, भीमा कोरेगाव बाबत फोन टॅप होऊ शकतील. पण त्याचा अहवाल पोलिसांना द्यावा लागेल. राजकारणी लोकांचे फोन टॅप झाले नाही. असं असेल तर आम्हाला त्याची माहिती नाही. गेल्या सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना किती अधिकार होते हे सर्वांनाच माहित आहे. हवं असेल तर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करावी.
दरम्यान भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कि , त्यावेळचे सरकार भाजपा-सेना युतीचं होते, त्यामुळे हा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावरही अविश्वास दाखवणारा आहे. भाजपा सरकार फोन टॅपिंग करू शकत नाही. पण काँग्रेस एनसीपीचं आघाडी सरकार असताना निलम गोरे, मिलींद नार्वेकर यांचे फोन टॅप केल्याची घटना घडली होती हे विसरतां कसं येणार. आघाडी सरकारमध्ये फोन टॅपिंग प्रकार घडत होते हे सिद्ध झालं होतं असा आरोप केलाय.
या विषयावर आपली प्रतिक्रिया देताना खा. संजय राऊत म्हणाले , मला आधीच माहीत होते की फोन टॅप होत होते. भाजपचे काही जवळचे माझे मित्र सुद्धा बोलले फोन टॅप होतोय म्हणून. शरद पवार एक मोठे नेते आहे, या आधी सुद्धा शरद पवारांवर हल्ला झाला होता. एका माथेफिरूने तो केला होता त्यात अशी सुरक्षा काढून टाकून काय साध्य करायला पाहिजे हे दिल्लीत बसलेल्या त्यांच्या गुरुंना कळायला हवं. आता राज्यात सरकार स्थपन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे त्यामुळे यामागे काय कुटनीती आहे हे बघावं लागेल. विरोधकांना काम करू द्ययाचं नाही असा रडीचा डाव खेळायचं हे राजकारण नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा चेला आहे असे घाबरून भिऊन आम्ही काम करत नाही. अडचण भाजप ची होईल की नाही माहीत नाही. पण ज्यांनी हे टॅपिंग केले त्या अधिकाऱ्यांच्या निष्ठा सुद्धा सरकारसोबत काय आहेत ते समोर आल्या आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, मी आणि माझ्यासोबत सुप्रिया सुळे यांचा सुद्धा फोन टॅप झालाय. निवडणूक काळात फोन टॅपिंग झालं, जागा वाटप वेळी झालं आम्हाला हे माहिती होतं पण आमही काही देशद्रोही कामं करत नव्हतो त्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला भीत नाही.