कंजारभाट समाज : असा समाज अशा प्रथा : मृत्यूनंतर मानसीला मिळाली ‘जातगंगा’, जात पंचायतीमुळे गेला तरुणीचा बळी
जग कितीही पुढे जात असते तरी जात पंचायतीच्या जाचक नियमांमुळे कंजारभाट समाजातील आणखी एका तरुणीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईसह तरुणीला जातीत घेण्यास तिच्या आजोबांनी नकार दिला होता. समाजात माझी इज्जत आहे. मी बाहेरच्या बाईला माझी जात देणार नाही, असे सांगून आजोबांनी नातीसह सुनेचा छळ केला होता. आजोबा आणि कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीच्या नकार घंटेमुळे अखेर मुलीने काकाच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. २३ जानेवारीला सकाळी ११.३० ला ही घटना घडली. मानसी असं मृत मुलेचे नाव आहे. विशेष म्हणजे मानसीला मृत्यूनंतर ‘जातगंगा’ देण्यात आली आहे. जातपंचायतीने मुलीच्या आईला तिच्या वडिलांकडून 20 हजार रुपये रोख देऊन मानसीवर कंजारभाट समाजाच्या परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करावे, असा निर्णय दिला आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , जळगाव शहरातील मध्यवस्तीत जाखनीनगर येथी ल कंजारभाट जातपंचायती समाजाचे वरिष्ठ सरपंच दिनकर बागडे (सेवानिवृत्त अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जळगाव) यांचा मोठा मुलगा आनंद बागडे (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, अमळनेर) यांनी मानसीच्या आईशी 20 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह (कोर्ट मॅरेज) केला होता. आनंद बागडे यांना या महिलेपासून दोन मुली झाल्या. (त्यातील एक मानसी) असे असतानाही आनंद यांचे त्यांच्या वडिलांना जातीतील मुलीशी विवाह लाऊन दिला होतो. नंतर तिच्यापासूनही आनंद यांना तीन आपत्ये झाली.
मानसी 12 वीत शिकत असताना तिने आजोबा दिनकर बागडे यांना आईला जातीत घेण्यासाठी अनेकवेळा विनंती केली. तुम्ही म्हणाल त्या कंजारभाट समाजातील मुलाशी लग्न करेन, मला जातीत घेऊन ‘जातगंगा’ द्या, अशी याचना केली होती. मात्र, दिनकर बागडे व जातपंचायत सदस्य सावन गागडे, दीपक माछरे, बिरुजू नेतले, मंगल गुमाने व संतोष गांरुगे आदींना मानसी आणि तिल्या आईला जातीत घेण्यास स्पष्ट नकार दिला. समाजात माझी इज्जत आहे. मी बाहेरच्या बाईला माझी जात देणार नाही, असे सांगून आजोबांनी नातीसह सुनेचा छळ केला. शेवटी मुलीचे काका विजय बागडे यांनी मानसीचे लग्न कोल्हापूर येथे निश्चित केला. लवकरच लग्नाची तारीखही ठरणार होती. परंतु आजोबा व जातपंचायतीच्या नकार घंटेमुळे शेवटी मानसी हिने 23 जानेवारीला सकाळी 11.30 वाजता विजय बागडे यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आजोबा दिनकर बागडे यांनी अद्याप मानसीला पाहिलेही नव्हते.