सत्ता गेल्याचे शल्य फडणवीस यांच्या मनातून जाईना , शिवसेनेने सत्तेसाठी बेईमानी केल्याची टीका
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील सत्ता गेल्याचे शल्य काही जाता जात नाही. पालघर येथील भापच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर बोलतांना याची पुन्हा प्रचिती आली . यावेळी बोलताना ते म्हणाले कि , जनतेने आम्हाला जनमत दिलं होतं, मात्र शिवसेनेने बेईमानी केली. वर्गात पहिल्या आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं असाही टोला फडणवीस यांनी लगावला. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीची देणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती मात्र ते आश्वासन ठाकरे सरकारनं पाळलं नाही अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ते पुढे म्हणले कि , सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का? असाही प्रश्न फडणवीस यांनी पुन्हा विचारला. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करु, विनाअट कर्जमाफी अशा घोषणा तर देण्यात आल्या होत्या मात्र त्या घोषणा हवेत विरल्या. सत्तेवर असलेल्या तीन पक्षांनी फक्त जनादेशाशी प्रतारणा केली नाही तर शेतकऱ्यांशी आणि जनतेशी प्रतारणा केली अशीही टीका फडणवीस यांनी केली.