Aurangabad : महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३०) सकाळी आंबेडकनगर भागात समोर आली. सविता रमेश भालेराव (२८, आंबेडकरनगर) असे या महिलेचे नाव आहे.
सविताचा विवाह १२ वर्षांपूर्वी रमेशसोबत झाला होता. दाम्पत्याला ११ वर्षाचा मुलगा आहे. मात्र दीड वर्षांपूर्वी दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर सविता विभक्त राहू लागली. मुलगा मामा राहत होता तर सविताने आंबेडकरनगर भागात खोली किरायाणे करून एकटीच राहत होती. सोमवारी सकाळी सविताने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारची नातेवाईक महिला सविताला भेटण्यास आली असता तिला हा प्रकार दिसून आला. तिने ९.४५ वाजता सिडको पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सविताला फासावरून उतरवून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून ११ वाजता मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ चव्हाण करीत आहेत.