महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा आज महाविस्तार
Maharashtra Cabinet expansion to take place tomorrow.
— ANI (@ANI) December 29, 2019
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन महिना उलटल्यानंतर अखेर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात आज दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकूण ३६ मंत्री शपथ घेतील, असे वृत्त आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे १३ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी १२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून फोन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांना शरद पवार यांच्याकडून मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड आणि मलिक उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत २८ नोव्हेंबरला सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश होता. त्यानंतर महिनाभर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. राज्याच्या मंत्रिमंडळात जास्ती जास्त ४३ मंत्री शपथ घेऊ शकतात. आता मुख्यमंत्र्यांसह ७ जणांनी शपथ घेतल्यानं आणखी ३६ जण शपथ घेऊ शकतात.
मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार, कोणाला कोणतं खातं मिळणार याची अधिकृत माहिती अद्याप कोणीही दिलेली नाही. मात्र, सध्या काही नेत्यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी खातेवाटपावरूनही आघाडीत बरीच चर्चा झाली आहे. त्यात गृह खाते शिवसेनेकडून राष्ट्रवादीला देण्याची चर्चाही होत आहे.
महाविकास आघाडीतील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, जळगाव, अब्दुल सत्तार, सिल्लोड, दादा भुसे, मनमाड, संजय रायमूलकर, बुलडाणा, बच्चू कडू (प्रहार), अमरावती, राहुल पाटील, परभणी, प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद, श्रीनिवास वनगा, पालघर, रवींद्र वायकर/ सुनील राऊत, मुंबई, तानाजी सावंत, उस्मानाबाद, शंभूराज देसाई, सातारा, भास्कर जाधव, कोकण, दीपक केसरकर, तळ कोकण, प्रकाश अबीटकर, कोल्हापूर, आशिष जयस्वाल, नागपूर, संजय राठोड, यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, बारामती, अनिल गोटे, जळगाव, धर्मराव बाबा आत्राम, विदर्भ, राजेश टोपे, जालना, नवाब मलिक , मुंबई, संग्राम जगताप, अहमदनगर, हसन मुश्रीफ, कोल्हापूर, अनिल देशमुख, नागपूर, इंद्रनिल नाईक, यवतमाळ, राजू शेट्टी/जयंत पाटील(शेकाप) कोल्हापूर / अलिबाग आणि काँग्रेसकडून के सी पाढवी, उत्तर महाराष्ट्र, अमित झनक, मालेगाव, यशोमती ठाकूर, विदर्भ, अशोक चव्हाण, मराठवाडा, अमीन पटेल, मुंबई, अमित देशमुख, लातूर, प्रणिती शिंदे, सोलपूर, सतेज पाटील, कोल्हापूर, विश्वजीत कदम, सांगली, जोगेंद्र कवाडे (मित्रपक्ष) मुंबई आदींच्या नावांची चर्चा आहे.