भारत धर्मशाळा नाही , भारत माता कि जय म्हणणारांचा भारतात राहण्याचा अधिकार : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान
केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्यात तोफ डागली ते म्हणाले कि , ‘आपण भारताला धर्मशाळा करणार आहोत का, जो येईल तो भारतात राहणार का? या आव्हानाचा विचार करावाच लागेल. या विचाराला अधिक स्पष्ट केले पाहिजे. त्यामुळे भारतात ‘भारत माता की जय’ म्हणणारेच राहतील, लोकांना याबाबतीत प्रश्न विचारण्याची हिम्मत होतेच कशी ? अ . भा . वि .प .च्या कार्यकर्त्यांनी अशा लोकांना विरोध करण्यासाठी पुढे यायला हवे.’ असे वक्तव्य पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी केले.
पुण्यात आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) ५४ व्या महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, उद्योजक प्रमोद चौधरी, राजेश पांडे, स्वप्नील बेगडे, अनिल ठोंबरे यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रधान म्हणाले की, ‘जगात सर्व देशांमध्ये नागरिकत्व कायदे लागू आहेत. काही देशांमध्ये, तर सरकारला प्रश्नही विचारता येत नाही. मात्र, देशात बौद्धिक ठेकेदारी आपल्याकडे असल्याचे काहींना वाटते. देशाचे तुकडे करणाऱ्या कंपूकडून नागरिकत्त्व कायद्याला, नागरिकत्व नोंदवहीला देशभरातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांतून विरोध केला जात आहे. नागरिकत्व कायद्याबाबत विनाकारण प्रश्न उपस्थित करून अपप्रचार केला जात आहे. या लोकांकडून कायद्याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत कशी होते, या प्रश्नाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी काळात विद्यापीठांमध्ये तिंरगा ध्वज रॅली काढावी,’ असे आवाहनही प्रधान यांनी केले. ‘अभाविप’मध्ये मंत्री म्हणून यशस्वी काम केल्यामुळेच आज केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करता येत असल्याचा दाखला प्रधान यांनी दिला.