सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? भाजपच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याने देवेंद्र फडणवीस संतप्त ,
सरकारने मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करीत महाराष्ट्र सरकारचं डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारत सीएएच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र शासनावर टीकास्त्र सोडले. तुम्ही आम्हाला मोर्चा काढण्यापासून रोखू शकता, आम्हाला परवानग्या नाकारु शकता मात्र सीएएचं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात सीएएच्या समर्थनार्थ सभा घेण्यात आली. त्याआधी रॅलीही काढण्यात आली. याच सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सीएएके सन्मानमें मुंबईकर मैदानमें’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची परवानगी मागितली होती. ती परवानगीही आम्हाला नाकारण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याची संमती हे सरकार नाकारत असेल तर मला टिळकांनी जो प्रश्न विचारला तो विचारावाच लागेल की या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? सुधारित नागरिकत्व कायद्याचं समर्थन करण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही असंही फडणवीस म्हणाले. तुमचं राजकारण संकुचित आहे, खुर्चीचा मोह तुम्हाला आहे त्याच राजकारणातून तुम्ही CAA विरोधात भूमिका घेत आहात आणि देश पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत असाही आरोप फडणवीस यांनी केला.
कुठल्याही धर्माच्या लोकांना आपल्या देशात जागा देऊन, त्यांच्या धर्माचा सन्मान करणारा भारत हा एकमेव देश आहे याचा तुम्हाला विसर पडला का? असाही प्रश्न फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला. पाकिस्तान, बांगलादेश यामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले ते या संकुचित लोकांना दिसत नाही का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.