Maharashtra : उद्यापासून नागपुरात राज्याचे हिवाळी अधिवेशन , सरकार गंभीर नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
राज्याचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरु होत असून त्याआधीच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. हे सरकार आल्यानंतर मदत मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा होती. आम्ही काळजीवाहू सरकारमध्ये असताना मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. आता निधी वाढवण्याच्या संदर्भात नवा अध्यादेश काढण्याकरता मान्यता दिली होती. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना या सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे ‘स्थगिती सरकार’ आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली असून या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि , नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार न करणे याचा अर्थ नागपूर अधिवेशन हे या सरकारला ‘सिरियस’ अधिवेशन वाटत नाही. केवळ वेळकाढूपणाचे धोरण म्हणून हे अधिवेशन कागदोपत्री घेण्याचा फास हे सरकार करत आहे. मंत्रीच नाही, मग विषय मांडायचे कुणाकडे, असा टोलाही फडणवीस त्यांनी सरकारला लगावला आहे.
राज्याची आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले कि , राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. सेना आमच्यासोबत राज्यात केंद्रात होती, मंत्रिमंडळ जे निर्णय झाले ते एकमताने झाले होते, विरोध झाला नव्हता. आता हे निर्णय कसे चूक होते हे काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेकडून वदवून घेत आहेत. आमची जेवढी जवाबदारी आहे, तेवढी सेनेची पण आहे, उत्तरे ही सेनेला पण द्यावी लागतील. सध्या महाराष्ट्र जवळजवळ ठप्प झाला आहे. कारण सुरू असलेली कामं फेरआढावा घेण्यासाठी थांबवण्यात आली आहेत . ज्या सरकारमध्ये धोरणांमध्ये सातत्य राहत नाही. राष्टीय पेयजलची कामे, ज्याला केंद्राने ८ हजार कोटींचा आराखडा मंजूर केला आहे, याला स्थगिती सरकारने दिलीय, ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करत भाजपने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.
राहुल गांधी यांच्यावर टीका
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले कि , देशात एकच व्यक्ती अशी आहे, ज्यांनी दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. आपल्या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. शिवसेनेची लाचारी त्यांना लखलाभ, अशा शब्दांत त्यांनी सेनेवरही टीका केली. या सरकरचे मुख्यमंत्री यांनी वारंवार मागणी केली होती की, २५ हजार प्रति हेक्टर, ५० हजार फळबागायत यांना मदत मिळाली पाहिजे. इतर पक्षांच्या नेत्यांनीही यापेक्षा मोठी मागणी केली आहे. आमची अशी अपेक्षा होती की पूर्तता तातडीने करेल. मात्र इतक्या बैठका झाल्या मात्र अवकाळी पाऊस मदतबाबत चर्चा झाली नाही, निर्णय घेतला नाही. आता जी माहिती अली आहे त्याप्रमाणे ९३ लाख हेक्टर एवढे नुकसान शेतीचे झाले आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन केलं तर २३ हजार कोटी रुपये या सरकारने स्वतः दिलेला शब्द पाळण्याकरता तातडीने शेतकऱ्यांसाठी रिलीज केले पाहिजेत, आम्ही या अधिवेशनात याबद्दल आठवण करून देणार आहे.