Aurangabad Crime : दुचाकीस्वार चोरांचा पुन्हा एकदा झटका ,वीस दिवसानंतर वृध्देचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले
वीस दिवसांपुर्वीच महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरांनी पळ काढला होता. ही घटना ताजी असतानाच १४ डिसेंबर रोजी पुन्हा त्याच परिसरातून चोरांनी एका वृध्देचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे. तत्पुर्वी वर्ष सरत आले तरी मंगळसूत्र चोरांची टोळी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. यापुर्वी देखील मंगळसूत्र हिसकावण्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत.
गारखेडा परिसरातील सुनंदा सुधाकर मुळे (७०, रा. आदर्श कॉलनी) या परिसरातील मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. सप्ताहाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या मैत्रिणीसोबत घरी परतत असताना संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास सुनंदा यांच्या हातात स्टुल व इतर साहित्य होते. घरापासून काही अंतरावरील जय भवानी हायस्कुलजवळील एका वळणावर त्यांच्यासमोर अचानक दुचाकीस्वार आला. त्याने दुचाकीचा वेग कमी करुन सुनंदा यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. ही घटना इतकी पटकन घडली की, त्यांची मैत्रिण देखील प्रचंड घाबरुन केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलिस निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वीस दिवसांपूर्वीही घडली होती अशी घटना……
दरम्यान पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या दोघांनी २५ नोव्हेंबर रोजी अनिता त्र्यंबक देशमुख (४८, रा. उत्तमनगर) यांचे भरदुपारी सव्वादोनच्या सुमारास १८ ग्रॅमचे मंगळसूत्र जय विश्वभारती कॉलनी परिसरातून लांबविले आहे. या घटनेचे पोलिसांकडे सीसी टिव्ही फुटेज देखील आहे. मात्र, अद्यापही हे चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
यापूर्वीचे चोरटेही अद्याप मोकाटच ……
गेल्या चार महिन्यांपासून मंगळसूत्र चोरांनी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत धुमाकूळ घातला आहे. मात्र, पुंडलिकनगर व सिडको पोलिस ठाणे वगळता कोणालाही मंगळसूत्र चोर पकडण्यात यश आलेले दिसून येत नाही. पोलिस महासंचालकांची पाठ फिरताच मंगळसूत्र चोरांनी तीन महिलांची मंगळसूत्रे हिसकावली होती.
२४ आॅगस्ट – तनूजा विपुलचंद कंदी (४८, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) या पतीसोबत दुचाकीवरुन जात असताना दुचाकीस्वार चोरांनी त्यांच्या गळ्यातील अठरा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले होते. पण यावेळी प्रसंगावधान ओळखून तनूजा यांनी मंगळसूत्र हातात घट्ट धरले होते. त्यामुळे त्यांचे अकरा ग्रॅम मंगळसूत्र चोराच्या हाती लागले होते. याचदिवशी काही वेळानंतर जयश्री संदीप देवगावकर (४४, रा. उल्कानगरी, गारखेडा) या सकाळी मुलाला आयकॉन इंग्लिश शाळेत सोडल्यानंतर घराकडे निघाल्या होत्या. यावेळी दुचाकीस्वार चोरांनी त्यांचे सतरा ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. तर मनिषा अनिल सोमवंशी (रा. छत्रपतीनगर, सातारा परिसर) यांचे अयप्पा मंदिराजवळून दोन ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले होते.
२८ नोव्हेंबर – अंजली अष्टीकर (६२, रा. साईनगर, सिडको) या सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास औषधी आणण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी दुचाकीस्वाराने त्यांचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले होते. याशिवाय तीन दिवसांपुर्वी वाळुज औद्योगिक वसाहतीतून देखील महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. या घटनांचा तपास अद्यापही लागलेला नाही.
वर्षभरात शहरात घडलेल्या एकूण मंगळसूत्र चोर्यांपैकी ४०टक्के चोर्या आम्ही उघडकीस आणलेल्या आहेत. प्रत्येकवेळेस नवीन मोडस आणि वेगवेगळ्या गॅंगचे चोरटे चोर्या करंत असल्याचे तपासात उघंड झाले आहे. मंगळसूत्र चोरांचा बंदोबस्त कायमचा कसा करायचा यावर लवकरच अंमलबजावणी होईल.
राहूल खाडे । पोलिस उपायुक्त, झोन २ । औरंगाबाद शहर