महाराष्ट्राचे सत्ताकारण : शिवसेनेसोबत सरकार बनविण्याची भाजपची आशा सुटेना….
भाजपची साथ सोडून काँग्रेस -राष्ट्रवादी सोबत महाआघाडी स्थापन करून सत्तेचा सोपं चढलेल्या शिवसेनेसोबत सरकार बनविण्याची भाजपची आशा काही सुटेना अशी अवस्था झाली आहे. या मुद्द्यावरून राज्यसभेचे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकते असा विश्वास व्यक्त करून खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या संदर्भात नवा फॉर्म्युलाही दिला आहे.
मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत मांडलेल्या नागरिकत्व विधेयकाला मंजुरी मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेला ऐतिहासिक क्षण असे संबोधले. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि , शिवसेनेने अजून हिंदुत्वाची विचारधारा सोडलेली नाही, ही चांगली बाब आहे. नागरिकत्व विधेयकाविरोधात शिवसेने मत दिले नाही. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्याची हिच योग्य वेळ आहे. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेऊ शकते.
दरम्यान, शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. परंतु, बुधवारी राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांनी मतदानाच्या आधीच वॉकआउट केले होते. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत शिवसेनेवर कडाडून टीका केली होती. सत्तेसाठी लोक केव्हा कसा रंग बदलतात, असे अमित शहा यांनी म्हटले होते. शिवसेनेने एका रात्रीत आपली भूमिका का बदलली, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, असेही अमित शहा म्हणाले होते त्यावर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी पक्षाची भूमिकाही मांडली होती.