नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला आसामात विरोध वाढला, हिंसाचाराचा भडका , केंद्राने केले लष्कराला पाचारण , १४ पोलीस अधीक्षकांच्या तडक फडकी बदल्या
लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये आंदोलन सुरूच असून या आंदोलनाचा पूर्वोत्तर राज्यात आगडोंब उसळला आहे. गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसाचार कमी होण्याऐवजी अधिकच उफाळून आला असून, या हिंसाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने लष्कराला पाचारण केले आहे. संतप्त झालेल्या जमावाने छबुआ येथील भाजपा आमदाराचं घरच पेटवून दिले. दरम्यान जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १४ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला आसाम, मेघालय, त्रिपुरा यासह ईशान्यकडील राज्यातून तीव्र विरोध होत आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये हिंसाचार उफाळून आला. लोकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर येत जाळपोळ केली. जमावाला रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. धक्कादायक बाब म्हणजे संतप्त जमावाने भाजपाच्या नेत्यांना आणि आमदारांनाही टार्गेट केले आहे. याच आंदोलनात छबुआचे आमदार बिनोद हजारिका यांचे घरही आंदोलकांनी पेटवून दिले. त्याचबरोबर परिसरातील वाहने आणि कार्यालयही जमावाने पेटवून दिले.
दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांना २२ डिसेंबरपर्यंत सुटी जाहीर केली आहे. तर हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील ४ पोलीस उपआयुक्त आणि १४ पोलीस अधीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्या आसामसह शेजारील राज्यात निम लष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मात्र, परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्यानं लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय मुख्यम सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आंदोलनानंतर आसाममध्ये पुढच्या ४८ तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवण्यात आले आहे. मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी त्यांच्याजागी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान धाकुआखाना, लखीमपूर जिल्ह्यात आंदोलकांनी भाजपा आणि आसाम गण परिषदेचे कार्यालय पेटवून दिले असून हिंसक आंदोलनाचा ईशान्येकडच्या राज्यामधील हवाई आणि रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. या आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवाही स्थगित करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये तर अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी अनेकदा गोळीबार करावा लागला. या गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.