Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आसाम : पूर्वोत्तर भागांमधील राज्यात CAB आणि NRC वरून संचारबंदी , जमावबंदी असतानाही आंदोलन पेटले , फोन आणि इंटरनेट सेवा पूर्णतः बंद

Spread the love

लोकसभा आणि राज्यसभेत मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयक पास करून घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मणिपूर, आसाममध्ये उमटत आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये आंदोलन पेटले आहे. या दोन्हीही राज्यातील परिस्थिती बिघडली असून संचारबंदी लागू असतानाही आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. दरम्यान आसाम, मणिपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जमावबंदी तर काही भागात संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या शेड्युलमध्ये ईशान्य भारतातला काही प्रदेशांचा समावेश केला असल्याने  हे प्रदेश CAB च्या कक्षेबाहेर आहेत. आसाममध्ये आधीच NRC अंतर्गत नागरिकत्व नोंदणी मोहीम राबवण्यात आली आणि आवश्यक कागदपत्रं दाखवून नागरिकत्व सिद्ध न करू शकलेल्या व्यक्ती बेकायदेशीर नागरिक ठरल्या. त्यांना घुसखोर ठरवण्यात येईल. याउलट आता बांगलादेशातून आणि इतर सीमेजवळच्या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना त्या त्या राज्यात अधिकृत नागरिकत्व घेता येईल. त्यातून या प्रदेशाची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थिती धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या दोन्हीही राज्यात कोणताही मोठा हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र सरकारकडून पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली असून हे आंदोलन थांबविण्यासाठी   विशेष काळजी घेतली जात आहे. बुधवारी रात्रीपासून काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात वातावरण तापल्यामुळे पूर्वोत्तर भागांतील विमानसेवाही खंडित करण्यात आली आहे. इसजेट, विस्तारा, इंडिगो कंपन्यांनी आसामला जाणारी विमानं शुक्रवारपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला त्रिपूरा, मिझोराम, मणिपूर, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आसाममध्ये अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती आसामच्या अतिरिक्त पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलं आहे.

दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्या घरावर तुफान दगडफेक केली आहे. मध्यरात्रीपासून गुवाहाटी इथली परिस्थिती तणावपूर्ण असल्यानं पोलीस आणि जवानांना पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे परिसरात भारतीय सैन्यदलाचे जवान आणि पोलिसांची ज्यादा कुमक तैनात आहे.

मंगळवारी पूर्वोत्तर भागांमधील राज्यात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आसाममध्ये या विधेयकाविरोधात तीव्र निदर्शनं केली जात आहेत.   राज्यभरात १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संध्याकाळपासून फोन आणि इंटरनेट सेवासुद्धा बंद आहेत. बुधवारी राजधानी दिसपूरच्या जनता भवनजवळ बस जाळण्यात आली होती. सचिवालयाजवळ पोलीस आणि विद्यार्थी निदर्शकांमध्ये झटापट झाली. स्वतः मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना या संचारबंदी आणि हिंसाचाराचा फटका बसला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!