Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागरिकत्व विधेयक : काँग्रेसच्या दबावामुळे सेनेने भूमिका बदलली – देवेंद्र फडणवीस

Spread the love

राज्यातले सरकार टिकवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव आणल्याने नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन घेतलेली भूमिका एका दिवसात बदलण्यात आली का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.  कारण लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर केले. त्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिला. मात्र या विधेयकातली सत्यता आणि स्पष्टता समोर आणली पाहिजे तोपर्यंत पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवू. येणारे लोक कोणत्या राज्यात राहणार? ते कोण आहेत? हे आधी स्पष्ट झाले पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी घेतली. त्यावरुनच फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. दरम्यान शिवसेना याबाबतची जुनी भूमिका बदलणार नाही अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली. दरम्यान अधिवेशनावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

“नागपूरचं अधिवेशन म्हणजे या सरकारची फक्त औपचारिकता आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवे सरकार स्थापन होऊन १३ दिवस झाले आहेत तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशा सगळ्या परिस्थितीत अधिवेशनादरम्यान आम्ही प्रश्न विचारले तर आम्हाला मंत्री म्हणून उत्तर कोण देणार?” असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. “आम्ही नागपूरचे हिवाळी अधिवेशन दोन आठवडे घेतले गेले पाहिजे अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी सरकारने मान्य केली नाही.” जे अधिवेशन घेतले जात आहे ती केवळ औपचारिकता आहे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मदतीवरुनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “राज्य सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांना मदत करणार होते. मात्र आता त्या मदतीचे काय झाले? अजूनही शेतकरी वाऱ्यावर आहेत. त्यांना दिलासा कोण देणार? अजून या सरकारच्या मंत्रिमंडळाचाच पेच सुटलेला नाही अशात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर विरोधी पक्ष सरकारसोबत आहे” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!