पत्नी मूळ गावी येत नाही म्हणून संतप्त पतीने केला चाकू हल्ला
पत्नी आपल्या सासरी मूळ गावी जाण्यास तयार होत नाही म्हणून संतप्त पटीने रागाच्या भारत पत्नीच्या गळ्यावर चाकूचे वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजवंशी ठाकुर दास (३० वर्षे, रा. जानकीनगर) असे आरोपीचे नाव आहे. जखमी पत्नीवर वेळीच उपचार झाल्याने तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी राजवंशी हा मजुरीचे काम करत असून त्याची पत्नी सोनू गृहिणी आहे. तो मूळ उत्तर प्रदेशातील झांशी जिल्ह्यात राज राहणारा असून सोनू ही नागपूरमधील रहिवासी आहे. लग्नानंतर हे दोघे नागपुरात राहत होते . या जोडप्याला एक सात वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी आहे. राजची झाशी येथील गावी परत जाण्याची इच्छा होती. त्याने त्यासाठी पत्नी सोनूमागे तगादा लावला होता. मात्र पालक येथेच असल्याने सोनू गावी परत जाण्यास तयार नव्हती. यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात राजने सोनूच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सोनू गंभीर जखमी झाली.
दरम्यान या प्राणघातक हल्ल्यानंतर आरोपी राजू पसार झाला आहे. सध्या जखमी सोनूची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.