Politics of Maharashtra : अजित पवारांच्या भूमिकेवर पवारांची प्रतिक्रिया काय ?
राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा स्वगृही परतल्यानंतर चूक झाल्याचं मान्य केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना माफही केले आहे का ?असा प्रश्न विचारल्यानंतर अर्थातच त्यांना माफ करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी ८० तासांनंतर पदाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला.
अजित पवार यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघालं होतं. अजित पवार यांचे मनपरिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत होते. दुसरीकडे अजित पवार हे पुन्हा परत येतील अशी आशा शरद पवार यांना होती. अखेर नेत्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अजित पवार परत आले. त्यामुळे त्यांचे पक्षात काय स्थान असेल यावर चर्चा चालू आहे.
दरम्यान त्यांच्या या निर्णयावर पक्षातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या ८० तासांनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार यांचं पक्षातील स्थान कायम राहील काय? आणि त्यांना राज्यात स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल काय, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये केली जात आहे. त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना नवाब मलिक म्हणाले कि . ‘अजित पवार यांनी सरतेशेवटी आपली चूक कबूल केली आहे. हे त्यांचे कौटुंबिक प्रकरण आहे आणि शरद पवार यांनी त्यांना माफ सुद्धा केलं आहे. अजित पवार यांचं पक्षातील स्थान बदलण्यात आलेलं नाही, ते कायम राहील.’